धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचे ‘प्रवेशद्वार’ व ‘औद्योगिक नगरी’ अशी ओळख असलेल्या तामलवाडी येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे अतिक्रमण मुक्तीची बैठक घेणार आहेत, त्यामुळे महसूल, आयआरबी व पोलिस प्रशासन कामाला लागले असुन धावपळ सुरु आहे. पालकमंत्री हे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांच्या शासकीय दौऱ्यानुसार ते 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी तामलवाडी टोलनाका येथील अतिक्रमण हटवीण्याबाबत व टोल नाक्यावरील स्वच्छतागृहाच्या सोयी सुविधाबाबत टोलनाका स्थळी बैठक घेणार आहेत.
तामलवाडी येथे अनेक उद्योग, कारखाने सुरु असुन हा औद्योगिक भाग ओळखला जातो, याच भागात अनेक गुंतवणूकदारानी विविध प्रकल्पासाठी जमिनी घेतल्या आहेत. टोल नाका सुरु झाल्यापासून तुळजापूर व सोलापूर अश्या दोन्ही दिशेला रस्त्याच्या दुतर्फा चहा, नाष्टा पाणीसह अन्य दुकाने सुरु आहेत. या भागात वाहतूक अडथळा होत असल्याने ‘अतिक्रमण’ काढा अशी जाहीर भुमिका घेत पालकमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. आजवर कोणत्याही पालकमंत्री यांनी याकडे लक्ष दिले नव्हते, हे विशेष.

धाराशिव शहरासह अन्य ठिकाणी सार्वजनिक जागेवर, रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असुन दुकाने, टपऱ्या सुरु आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पालकमंत्री सरनाईकांची तामलवाडी येथील बैठक ‘अतिक्रमण मुक्त धाराशिव जिल्हा’ मोहिमेचा ‘श्रीगणेशा’ करणारी ठरावी अशी अपेक्षा आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील शेतकरी आहेत. पालकमंत्री म्हणुन शेतकरी होण्याचा ‘मान’ त्यांना यानिमित्ताने मिळाला आहे. त्यांच्या नावे 114,116,117,129,210 व 211 अश्या 6 गटात 8.22 हेक्टर म्हणजे जवळपास 20 एकर ‘हाय वे’ टच जमीन असुन ‘जमीनदार’ बनले आहे. तामलवाडी भागातील शेतकरी म्हणुन त्यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केल्याचे अतिक्रमण बैठकीवरून दिसते. तामलवाडी विकासासाठी त्यांचा ‘लाभ’ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.











