मोकाट कुत्र्यांच्या अंत्यविधी केंद्रासाठी 23 कोटी – लोकप्रतिनिधीची चुप्पी, धाराशिवकरांची आर्त हाक
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तसेच पाळीव अथवा मोकाट प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत नागरी परिक्षेत्रात भटक्या – मोकाट कुत्र्यांसाठी निवारा (Dog Shelter) तयार करणे तसेच पाळीव-मोकाट प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र ( स्मशानभुमी) उभारण्याच्या कामास पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी परवानगी दिली आहे.
धाराशिव,तुळजापूर,नळदुर्ग, उमरगा,मुरूम,कळंब,भूम व परंडा या 8 नगरपरिषदा,तसेच वाशी व लोहारा बु.या 2 नगरपंचायत अश्या 6 ठिकाणी सुविधासाठी 23 कोटीची तरतूद केली आहे. प्राप्त अंदाजपत्रकांना सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता लवकरात लवकर घेऊन जिल्हा नियोजन समितीपुढे प्रस्ताव सादर करून प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे असे प्रसिद्धीपत्रकात कळविले आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे या योजनेतून प्राणी प्रेम, दया दिसुन येते ती नक्कीच कौतुकास्पद आहे, मात्र कामाचा प्राधान्यक्रम चुकलाच असे म्हणावे लागेल. धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात रस्ते, नाली, स्वच्छता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यासह अन्य नागरी समस्या तशाच आहेत. प्राण्यावर नक्की प्रेम करा मात्र इथे धाराशिवकरांना नागरी सुविधा नसल्याने जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागत आहेत, हेही वास्तव आहे. प्राधान्यक्रम ठरवून माणसांच्या समस्याकडेही पालक म्हणुन पहा अशी हाक या निमित्ताने धाराशिवकर करीत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावात आजही स्मशानभुमी नाही, जिथे आहे तिथे सुविधा नाहीत, शेवटचा प्रवासही नशिबात खडतरचं… स्मशानभुमी नसल्याने गावात वाद, आंदोलने झाली. शहरी भागात अनेक ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाहीत याचाही विचार करावा. निधीचा खडखडाट असताना भटक्या कुत्र्यांना निवारा व अंत्यविधी केंद्रासाठी निधी मिळत असल्याने ते एक प्रकारे ‘नशीबवान’ प्राणी ठरले आहेत. 23 कोटी रुपयांच्या विकास निधीतून अनेक कामे झाले असती, ज्या प्रकारे कुत्र्यांचा विचार करीत सढळ निधी दिला तसाच नागरी समस्यानाही द्यावा.
‘उघडा डोळे बघा नीट’ अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटत आहे. सरकारकडे कुत्र्याच्या अंत्यविधीसाठी निधी आहे मात्र इतर कामासाठी नाही. विकास कुठल्या दिशेने वाटचाल करीत आहे. काम दमदार, अजब तुमचे सरकार अशी प्रतिक्रिया उमटत आहे. 23 कोटींचे कामाचे स्वरूप, अंमलबजावणी यंत्रणा, कोणता लाडका ठेकेदार हे काम करणार हेही पाहावे लागेल.
धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद व लोकप्रतिनिधी यांनी या योजनेची व निधीची मागणी न करताही 23 कोटी निधीला परवानगी दिली आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीत याला खासदार, आमदार व इतर सदस्य मंजुरी देणार का ? की राजकीय हीतसंबंध, मर्जी राखून मान्यता देणार याकडे लक्ष लागले आहे. अंत्यविधी कसा करायचा याची आदर्श कार्यपद्धती सुद्धा ठरवावी लागेल.
पालकमंत्री यांनी अनेक निर्णय व विकास कामातून धाराशिव जिल्ह्यात ठसा उलटवला आहे, अनेक चुकीच्या प्रकार व गोष्टींना त्यांनी थारा दिलेला नाही, ठोस व रोखठोक भुमिका घेतली त्यामुळे ड्रग्ज, कला केंद्र हे सामाजिक प्रश्न मार्गी लागले. पालकमंत्री यांनी जनतेच्या समस्यांना सुद्धा प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.











