अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्षाचा करा – अध्यक्ष व सदस्यांना काम व मानाप्रमाणे वेतन वाढवा
धाराशिव – समय सारथी
आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030′ हा मोहिमेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पना व पुढाकारातून अनेक विकास कामे करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ हा अडीच ऐवजी सरपंच प्रमाणे 5 वर्षाचा करावा. अध्यक्ष व सदस्यांना काम व मानाप्रमाणे वेतन वाढवावे अशी मागणी अर्चना पाटील यांनी गोरे यांच्याकडे केली.
‘आपला जीव धाराशिव’ या गाण्याचे लोकार्पण करण्यात आले, ही जिल्हा परिषद विकासाची टॅगलाईन असणार आहे. आरोग्य विभागात धाराशिव राज्यात प्रथम असुन शिक्षण विभागात प्रथम आणण्याचा संकल्प पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी विभाग अंतर्गत प्रत्येक गावात महिलांचे गट तयार करण्यात येणार असुन आशा वर्कर यांना इलेक्ट्रिक स्कुटी व 5 जी मोबाईल दिला जाणार आहे असे त्या म्हणाल्या.
उदघाटना बरोबर काम करण्याची जबाबदारी असुन 2030 पर्यंत ही सगळी कामे पुर्ण केली जातील असे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली असुन सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी निवासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. सरपंच 5 वर्षासाठी मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अडीच वर्षासाठी का ? असा सवाल करीत असा दुजाभाव करू नये अशी मागणी त्यांनी केली. अडीच वर्ष हे समजुन घेण्यासाठी व नवीन आलेल्या अध्यक्षला अडीच वर्ष काम करण्यासाठी लागतात. अनेक कामे, योजना अपुऱ्या राहतात. स्थानिक स्वराज संस्था बळकटीकरण करण्याचा अजेंडा सरकारचा आहे त्यामुळे 5 वर्ष मुदत करावी. जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य यांना मानाप्रमाणे व कामाप्रमाणे वेतन मिळावे अशीही मागणी केली.
2026 ते 2030 या काळात जिल्हा व जिल्हा परिषदेला व्हिजन असावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्या म्हणाल्या. उद्यापासून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावातील टीव्ही, मोबाईल हे सायंकाळी 7 ते 9 बंद असतील, त्यासाठी शिक्षक, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद अधिकारी यांना गावे दत्तक देण्यात आली असुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव जिल्हा हा सगळ्यात अगोदर हागणदारी मुक्त झाला. वृक्षारोपणसोबतच संवर्धनावर सुद्धा भर दिला जाणार असुन 110 गावात सोलर उर्जेंवर चालणारे विद्युत शवदाहिनी देण्यात येणार आहे.
प्रत्येक घरावर व शासकीय इमारतीवर सोलर बसविण्यात येणार आहे. वृक्ष लागवडची जबाबदारी ग्रामपंचायतला देण्यात येणार असुन मेरी पंचायत ऍपवर ते ऍड करून संगोपन सुद्धा केले जाणार आहे. जे वृक्ष संगोपन करणार नाहीत त्यांना निधी दिला जाणार नाही. प्रत्येक ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात येणार आहे. कॅन्सर आजार होऊ नये यासाठी प्लास्टिक बंदी व चहाचे कप बंद असतील जे वापरणार त्यांना 1 हजार व त्या ग्रामपंचायतील 10 हजार दंड लावणार असल्याचे त्या म्हणाल्या. इलेक्ट्रिक घंटागाडीचे नियोजन असुन त्यासाठी 770 गाड्या घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.
83 अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन त्याला नमो अर्थात नरेंद्र मोदी अभ्यासिका असे नाव दिले जाणार आहे. त्यात संगणक, पुस्तके, वायफाय व इतर सुविधा असणार आहेत. 5 वी ते 10 वी पर्यंत मुलींच्या शाळेत स्वच्छता गृह असणार आहे, 140 टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडण्यात येणार आहे. अभ्यास सोबत एक कला यावी यासाठी प्रोत्साहन देणे, शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शेतात नेहून काम करणे, पेरणी असे शिकवले जाणार आहे. जनावरासाठी पाणवठे सुरु केले जाणार आहेत, डिसेंबरमध्ये बाल साहित्य संमेलन केले जाणार असुन त्यासाठी 50 लाखांचा निधी ठेवला आहे.
यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, उपाध्यक्ष उषा रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांवदा महाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगराध्यक्ष नेहा काकडे, नितीन काळे, ऍड नितीन भोसले यासह जिल्हा परिषद सभापती, सदस्य उपस्थितीत होते. जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) तुकाराम भालके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.











