पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात येणार – आमदार पाटील
धाराशिव – समय सारथी
पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे 50 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याच्या व्यवहार्यता अहवालानंतर आता ‘डीपीआर’च्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 24 कोटी निधी दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणाऱ्या पुराच्या तडाख्यातून मुक्त करून ते समुद्राला वाहूंजनारे अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पाचा ‘व्यवहार्यता अहवाल’ (Feasibility Report) सकारात्मक आल्यानंतर, आता आपल्या महायुती सरकारने’सविस्तर प्रकल्प अहवाल’ (DPR) तयार करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी 24 कोटी 5 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
धाराशिव, लातूर आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाड्याचा दुष्काळी प्रश्न यामुळे पुर्णतः पुसून निघणार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळी प्रश्नासाठी हे एक मोठे उत्तर ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.कृष्णा खोऱ्यात पावसाळ्यात अतिरिक्त होणारे आणि समुद्राला वाहून जाणारे 50 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मराठवाड्याच्या दिशेने वळवण्यात येणार आहे.
कोल्हापूर-सांगली भागातील पुराचे संकट टाळून हे पाणी दुष्काळी भागातील सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरण्याचे मोठे नियोजन आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील अत्यंत दुष्काळी मानल्या जाणाऱ्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. सोबतच शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या हे पाणी वळवणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी जागतिक बँकेची तांत्रिक सल्लागार असलेल्या ‘ट्रॅकबेल’ या संस्थेने अभ्यास करून व्यवहार्यता अहवालात सकारात्मक दिला आहे.
व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यवर मिळाल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून वाहून जाणारे पुराचे 50 अब्ज घनफूट पाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी उपलब्ध होणार आहे. अंदाजे 16 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल असा अंदाज आहे.
आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या पूर्व संभाव्यता अहवालानुसार हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कृष्णा नदीवरील सापटेवाडी बंधाऱ्यापासून नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यापर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात उद्धट बंधाऱ्यापासून उजनी धरणापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन आहे. या दोन्ही टप्प्यांसाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, अन्वेषण आणि डीपीआर तयार करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे.
पुराचे अतिरिक्त पाणी वाहून आणण्यासाठी सुमारे 100 किलोमीटर लांबीचा नवीन बोगदा आणि अस्तित्वात असलेल्या बोगद्यांची क्षमता वाढवणे, अशा तांत्रिक बाबींचाही या कामात समावेश असणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देण्यासाठी आजवर अनेक योजना आखल्या गेल्या, मात्र 50 टीएमसी पाणी वळवण्याची ही योजना सर्वाधिक प्रभावी ठरणार आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पासह या नवीन योजनेमुळे मराठवाड्याच्या शेतीचे आणि उद्योगांचे चित्र पूर्णपणे पालटू शकेल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.











