धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या ( एमएसआयडीसी ) कारभाराची आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात पोलखोल करीत गंभीर आरोप केले. धाराशिव येथील मेडिकल कॉलेज इमारतीच्या टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला, कागदपत्रे मागवूनही ती खोटी दिली जातात. बार्शी ते धाराशिव हा रस्ता 10 मीटरचा तर धाराशिव बोरफळ औसा हा रस्ता 7 मीटरचा केला आहे, असा प्रकल्प बनवतात.
रस्त्याची अनेक कामे मंजुर असतानाही ती अपूर्ण आहेत. रोज अपघात होत असुन लोकांचे मृत्यू होत आहेत, लोक आंदोलन करीत आहेत. 43 हजार कोटींची मंजुरी देण्यात आली मात्र प्रत्यक्षात 3 हजार कोटी मिळाले. बील मिळत नसल्याने कामे होत नसल्याचे ठेकेदार सांगतो, त्याला डाबराचे भाव वाढल्याने व इतर कारणाने मुदतवाढ दिली जाते. अशी स्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ ( एमएसआयडीसी ) कारभार अजब आहे.
व्यवस्थापकीय संचालक हे दीक्षित नावाचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. सेवानिवृत्त अधिकारी यांना इथे का बसवले तर फक्त टेंडर मॅनेज करून द्यायचे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असे तत्व असते मात्र या विभागात जास्त टक्केवारी देणाऱ्यास प्राधान्य हे आहे. ठेकेदार याची कागदपत्रे खरी आहेत की खोटी यासह कोणत्याही कागदपत्राची पाहणी तपासणी केली जात नाही फक्त टक्केवारी हा निकष आहे.
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम हाती घेण्यात आले. या महामंडळाकडे ठराविक कर्मचारी आहेत, फक्त टेंडर मॅनेज करण्या इतपत माणसे आहेत. धाराशिव येथे ठेकेदार बोगस कागदपत्रे आधारे ग्राह्य धरला गेला, कदाचित जास्त टक्केवारी दिली असल्याने त्याला प्राधान्य दिले असावे. मी याबाबत माहिती मागवली मात्र ती अधिकाऱ्यांनी खोटी दिली गेली.
1 लाख कोटींची कामे असुन प्रकल्प अहवाल तयार करायला खासगी माणसे, कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्रयस्थ बाहेरील यंत्रणा या खात्यातील माणसांना काहीच काम राहत नाही. प्रकल्प अहवालाचे त्यांनी धाराशिव येथील उदाहरण दिले, बार्शी ते धाराशिव हा रस्ता 10 मीटरचा तर धाराशिव बोरफळ औसा हा रस्ता 7 मीटरचा केला आहे. लहान मोठा रस्ता केला, तो पण अर्धवट. धाराशिव शहरातून रस्ता जातो त्याला नाली नाही त्यामुळे पावसाळ्यात पाऊस झाला की सगळे पाणी लोकांच्या दुकानात व घरात जाते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना उद्देशून ते म्हणाले की, राजे आपण छत्रपती घराण्याचे वंशज आहेत, तुमच्याकडुन काही अपेक्षा आहेत. शिवाजी महाराज यांनी भ्रष्टाचाऱ्याच्या कडेलोट केला. संभाजी महाराज यांनी तर हत्तीच्या पायाखाली दिले. आजच्या स्तिथीत ठेकेदार यांची बिले द्यायला पैसे नाहीत, काही ठेकेदार आत्महत्या करीत आहेत दुसरीकडे एमएसआयडीसीने एक अजब अट टाकली आहे. निविदा रकमेपेक्षा कमी दराने बिलो टेंडर भरले तर 7.5 टक्केची अतिरिक्त परफॉर्मन्स गॅरंटी द्यावी लागेल.
एमएसआयडीसीचे एकही टेंडर कमी दराचे नाही. केंद्रात गडकरी यांच्या खात्यात 30 ते 35 टक्के बिलोने निविदा होतात मग इथे का नाही. राज्य आर्थिक अडचणीत असताना जादा दराने टेंडर का ? मागील 3 ते 4 वर्षात मंजुर केलेली कामे व टेंडर तपासण्यासाठी एक त्रयस्थ समिती नेमावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. कंत्राटदार योग्य आहेत का, कागदपत्रे पाहावीत, केवळ टक्केवारी दिली म्हणुन काम दिले का? सेवानिवृत्त ऐवजी तुकाराम मुंडे सारखा अधिकारी नेमा म्हणजे खरे खोटे बाहेर येईल.एका बाजुला ना खाऊंगा ना खाने दूंगा असे म्हणायचे व दुसरीकडे सरसकट भ्रष्टाचार करायचा हे योग्य नव्हे असे ते म्हणाले.











