धाराशिव – समय सारथी
भुसंपादन मावेजा घोटाळ्यात बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी अटक केली असुन त्यांना कोर्टाने 15 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असुन ती आज संपत आहे. पाठक यांच्या प्रशासकीय कार्यपद्धती बाबत अनेक रंजक बाबी समोर येत असुन धाराशिव येथे ते असताना एका जमीन भुसंपादन प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगत आहे. तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक व भुसंपादन अधिकारी शिल्पा करमरकर यांनी पदाचा दुरुपयोग करून नातेवाईक व पतीच्या नावे जमीन खरेदी करून त्यांना लाखो रुपयांचा भुसंपादन मावेजा मिळवून दिल्याचा आरोप आहे.
धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणात हा भुसंपादन घोटाळा घडला आहे. सध्या लातुर येथील अपर जिल्हाधिकारी व तत्कालीन भुसंपादंन अधिकारी शिल्पा करमरकर यांनी त्यांचे पती उमेश उणकल ( सोलापूर ) व त्याचे नाशिक येथील सीए पंकज देशपांडे यांनी मार्च 2016 मध्ये ताकविकी येथील गट क्रमांक 173 मध्ये 83 आर जमीन 19 लाखात खरेदी केली. त्यानंतर सप्टेंबर मध्ये भुसंपादन झाले त्यात 17 गुंठे जमीन संपादित झाली व 46 लाखांचा मावेजा देण्यात आला. अवघ्या काही महिन्यात ते ‘लखपती’ झाले. हा सगळा ‘योग’ घडवून आणला.
जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांचे नातलग व मित्र सुमेध पाठक, प्रणव पाठक (तुळजापूर), व्यंकटेश देशमुख व कृष्णा देशमुख (मुंढवा, पुणे) यांनी देखील ताकविकी शिवारातच गट क्र. 172 मध्ये 2 हेक्टर 29 आर इतकी जमीन 10 लाख 90 हजारांत खरेदी केली, त्यातील 18 गुंठे जमीन चौपदरीकरणात संपादित झाली. त्यांना 49 लाख रुपयांचा मावेजा मंजूर झाला. जमीन भुसंपादन होणार असल्याचे माहिती असल्याने या अधिकारी जोडीने पदाचा दुरपयोग करून कमी किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या व त्या संपादित करून लाखो रुपयांचा मावेजा दिला.
खरेदीदार हे दूरचे नातेवाईक आहेत, माझा संबंध नाही असे सांगून पाठक यांनी हातवर केले होते तर कायद्याचे उल्लंघन केले नाही, गुंतवणूक करण्याची संधी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी गुंतवणूक करु नये काय ? असा प्रतिप्रश्न करमरकर यांनी उपस्थितीत केला. सगळा पैसा व्हाईट मनीचा असुन त्याचा उल्लेख रिटर्नमध्ये केला असल्याचे त्यावेळी उनकल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हे प्रकरण चर्चेत आल्यावर तात्काळ लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले मात्र नंतर हे प्रकरण शांत झाले.
प्रशासकीय कार्यालयात सोबत असलेले पाठक व करमरकर यांच्या ताकविकी येथील खरेदी जमिनी सुद्धा शेजारी शेजारी आहेत. दोंघांचे समान क्षेत्र संपादीत झाले, हाही त्यातील ‘योगायोग’.. तिथेच जमीन घ्यावी म्हणजे लाभ मिळेल असे स्वप्न कदाचित पडले असावे. अधिकारी यांनी संधी आल्यावर गुंतवणूक करू नये का असे म्हणत पाठराखण केली गेली मात्र पदाचा दुरुपयोग केला त्याचे काय ? नागपूर- रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणात धाराशिव जिल्ह्यात घातलेल्या या घोळाची व मावेजा वाटपाची चौकशी होणे गरजेचे आहे.
बीड जिल्ह्यात सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या 73 कोटी रुपयांच्या भूसंपादन घोटाळ्यात पाठक हे आरोपी आहेत. 154 प्रकरणांमधील वाढीव मोबदला मंजुर करण्यात आला, तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांनी वाढवण्यात आला. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी सचिन पांडकर, व्यंकटराम या अधिकारी यांची टीम तपास करीत असुन पोलिसांनी लॅपटॉप व इतर पुरावे गोळा केले आहेत. 7 दिवसांच्या पोलिस कोठडीत काय निष्पन्न झाले हे पोलिस आज कोर्टात मांडणार आहेत. पाठक यांना वाढीव कोठडी मिळते की जेलमध्ये रवानगी होते याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे.












