धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात कोर्ट 14 मे रोजी निकाल सुनावणार आहे, या हत्याकांडाला 20 वर्ष झाले आहेत. नात्याने चुलत भाऊ असलेले राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जन यात आरोपी असुन निकालाकडे लक्ष लागले आहे. 2006 साली झालेल्या या हत्याकांडनंतर धाराशिव जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलले त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या, त्याच प्रमाणे निकाल आल्यानंतर सुद्धा राजकीय पडसाद उमटणार आहेत. हत्याकांड नंतर डॉ पाटील साडे 3 महिन्यात जामीनावर बाहेर आले तर पारसमल जैन हा 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन मिळाला.
एकेकाळी डॉ पद्मसिंह पाटील व पवनराजे निंबाळकर एकत्र होते, 1978 साली डॉ पाटील यांनी शेकापचे बलभीमराव देशमुख यांचा 9 हजार 516 मतांनी पराभव करून पहिल्यादा आमदार झाले, त्यानंतर सलग 7 टर्म ते निवडून आले. काही राजकीय मुद्यावरून डॉ पाटील व पवनराजे यांच्यात वितुष्ट आले. 2004 साली पवनराजे यांनी दंड थोपटत डॉ पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक लढवली त्यात 484 मतांनी डॉ पाटील विजयी झाले. पवनराजे यांचा पराभव झाल्यानंतर तेरणा ट्रस्ट व कारखानावरून आरोप प्रत्यारोप सुरु होत नेते कार्यकर्ते भिडले.
3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा यासाठी मोर्चा काढण्यात आला तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली, त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनी 10 जुनला प्रफुल्ल पटेल व त्रिपाठी यांनी हकालपट्टी केली.
घटनेचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या आयबीएन लोकमत या प्रसार माध्यमाच्या गाडीवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी 5 हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल केले त्यानंतर डॉ पाटील यांना 25 सप्टेंबर 2009 रोजी जामीन अलिबाग कोर्टाने 2 लाखांच्या बॉण्डवर जामीन दिला, ते साडे 3 महिन्यांनी बाहेर आले. त्यानंतर त्यांनी 2014 पर्यंत लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावले मात्र पराभव झाला, ते सक्रीय राजकारणापासून अलिप्त होत गेले.
हत्याकांड नंतर झालेल्या पहिल्याच 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कै पवनराजे यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी राणाजगजीतसिंह पाटील यांचा 16 हजार 974 मतांनी पराभव केला. या हत्याकांडनंतर डॉ पाटील व निंबाळकर असे एकमेकासमोर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. डॉ पाटील परिवाराने विकासाचा मुद्दा पुढे करीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेरणा ट्रस्ट व हत्याकांड हे त्यांच्या पक्षबदलाचे एक कारण बोलले जाते. कालांतराने महायुतीच्या जागा वाटपात राणाजगजीतसिंह पाटील यांनी धाराशिव सोडून तुळजापूर मतदार संघ निवडला, त्यांच्या पत्नी अर्चनाताई राजकारणात आल्या. राणाजगजीतसिंह व ओमराजे यांच्यात ‘बाळा’ शब्दावरून अनेकदा चकमक झाली.
डॉ पाटील यांच्यानंतर त्यांचा मुलगा, सुन, नातू हे राजकारणात आले. पवनराजे यांच्या हत्येनंतर काही काळ त्यांच्या पत्नी आंनदीदेवी तेरणा कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात आल्या तर जयराजे हे उद्योगाकडे वळले. डॉ पाटील व निंबाळकर हा सत्तासंघर्ष गेली 2 दशकापासून व तिसऱ्या पिढीपर्यंत सुरु आहे. मल्हार पाटील हे आता ओमराजे विरोधात धुरा सांभाळत अनेकदा आव्हान देत असतात. वडिलांच्या हत्येत न्याय मिळावा यासाठी जय व ओमराजे हे गेली 20 वर्ष कायदेशीर लढा देत आहेत.
हत्याकांडातील सर्व आरोपी जामीनावर असुन डॉ पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. पारसमल जैन माफीचा साक्षीदार आहे, त्याला 14 वर्षांनी जामीन मिळाला, 25 मे 2009 ला अटक केली त्यानंतर तो 13 डिसेंबर 2023 पासून जामीनावर आहे. शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन मंजुर करण्यात आला. दिनेश तिवारी याला 25 मे 2009 तर पिंटू सिंग याला 15 जुन 2009 रोजी अटक करण्यात आली होती, तेव्हापासून एप्रिल 2025 पर्यंत दोन्ही संशयित आरोपी जेलमध्ये होते. महात्मा उर्फ पिंटू सिंग हा आरोपी दुसऱ्या एका गुन्ह्यात बिहार राज्यातील सिवान जेलमध्ये आहे.
हत्याकांडात आरोपीना शिक्षा झाल्यास त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे, त्यानंतर जामीन व अपील. आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्यास सीबीआय किंवा निंबाळकर हे निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊन निर्णया विरोधात अपील करू शकतात. थोडक्यात दोन्ही पक्ष अपीलात जाऊ शकतात. निकालानंतर आरोप प्रत्यारोप होणार आहेत हे मात्र नक्की.












