धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात तामलवाडी पोलिसांनी 3 आजी माजी नगराध्यक्ष, 1 सभापतीसह अन्य आरोपी विरोधात तब्बल 4 हजार 582 पानांचे पुरवणी दोषारोप पत्र धाराशिव कोर्टात सादर केले आहे. यापुर्वीच्या 14 व नंतर 25 अश्या 39 आरोपी विरोधात ड्रग्ज तस्करी, खरेदी विक्री व सेवन असा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी 37 जणांना साक्षीदार केले असुन आरोपींचे आर्थिक व्यवहार, संभाषण, कॉल डिटेल, 164 प्रमाणे घेतलेले जबाब व जुन्या गुन्ह्याची जंत्री जोडली आहे. दोषारोप पत्रातुन अनेक धक्कादायक खुलासे, माहिती आगामी काळात समोर येणार असुन दैनिक समय सारथी या ड्रग्ज तस्करीचा सुरुवातीपासुन पाठपुरावा करीत आहे.
मुंबई येथील वैभव गोळे व नळदुर्ग येथील इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकूर या दोघांना फरार दाखवण्यात आले असुन अटक व भारतीय नागरी सुरक्षा संहिता 193(9) प्रमाणे पुरवणी दोषारोप पत्राची तजवीज ठेवली आहे हे दोघे 14 फेब्रुवारी 2025 पासुन फरार आहेत. ठाकूर हा पोलिसांना शिवीगाळ व गुटखा तस्करी गुन्ह्यात फरार असुन शोध सुरूच आहे. संगीताला अटक करताना हाताशी आलेला वैभव गोळे निसटला तर ठाकूर हा नळदुर्ग परिसरात असतानाही त्याला स्थानिक पोलिसांनी अभय दिल्याचा आरोप होत आहे.
विद्यमान नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू भाई गंगणे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, संतोष मेंबर कदम परमेश्वर , माजी सभापती शरद जमदाडे यांच्यासह स्वराज तेलंग, प्रसाद कदम परमेश्वर, उदय शेटे, आबाजी पवार, अलोक शिंदे, आबाजी पवार, अभिजीत गव्हाड, विनायक इंगळे, शाम भोसले, संदीप टोले, जगदीश पाटील, विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव, दुर्गेश पवार, रणजीत भोसले, अर्जुन हजारे, नाना खुराडे, शुभम नेप्ते, राजू उर्फ पिटा सुर्वे व अतुल अग्रवाल अश्या 25 जणांविरोधात दोषारोप पत्र सादर केले आहे. तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी 30 मे 2026 रोजी दोषारोप पत्र दाखल केले आहे.
ड्रग्ज तस्करीत यापुर्वी पोलिसांनी 16 एप्रिल 2025 रोजी कोर्टात 10 हजार 744 पानाचे चार्जशीट दोषारोपपत्र दाखल केले होते. अमित आरगडे, युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, ऋतूराज गाडे, सुमित शिंदे, संकेत शिंदे, सुलतान उर्फ टिपू शेख, जीवन साळुंके, राहुल परमेश्वर कदम, गजानन हंगरगेकर अश्याच 14 जणांवर दोषारोप पत्र दाखल केले होते. मुळ व पुरवणी असे तब्बल 15 हजार पानांचे राज्यातील विक्रमी दोषारोप पत्र झाले आहे. हे. 3 वेगवेगळ्या कारवाईत 64 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 89 पुड्या जप्त करीत 39 आरोपींचा छडा लावत विक्रम केला.
जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांची यात महत्वाची भुमिका ठरली, कोर्टात सरकारची बाजु मांडल्याने अनेक आरोपीना अटकपुर्व जामीन मिळाला नाही, त्यांना अटक होऊन पोलिस कोठडीत व जेलमध्ये जावे लागले, काहींना उच्च न्यायालयात जामीन मिळाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात हे प्रकरण चालले. पोलिस अधीक्षक रितू खोकर, तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. 2 आरोपी फरार असल्याने पोलिसांचा तपास सुरु आहे, तस्करीचा मास्टर माईंड कोण ? हे समोर आलेले नाही.
ड्रग्ज तस्करी प्रकरण विविध अनुषंगाने, आरोप प्रत्यारोपामुळे राज्यभर व विधिमंडळात चांगलेच गाजले. काही आरोपीना अभय, त्यांचे राजकीय पुनर्वसन, अटकेनंतर पक्ष प्रवेश यासह अन्य टप्पे महत्वाचे ठरले. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने अनेक घडामोडी घडल्या. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी वारंवार आवाज उठवला.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व पाठबळाने नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी पोलिसांना ड्रग्ज तस्करीची टीप दिली, त्यानंतर 3 वेळेस ट्रॅप लावण्यात आला त्यातील 2 अपयशी ठरले अखेर 14 फेब्रुवारी रोजी आरोपी जाळ्यात अडकल्याने भांडाफोड झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार यासह पथकाची थेट गोपनीय कारवाई, फरार आरोपीना अटक अश्या वेगवेगळ्या टप्यावर भुमिका महत्वाची ठरली.











