तामलवाडी, येडशी, पारगाव, तलमोड या 4 टोल नाक्यावर कारवाईचे आदेश – राजहट्ट, लोकप्रतिनिधीचे मौन
धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री की रिसॉर्ट मंत्री ? आहेत, विकास नेमका कुणासाठी आहे. रिसॉर्टचा धंदा तेजीत यावा म्हणुन टपरी ठेलेवाल्यांच्या पोटावर पाय देऊन बुलडोजर चालवता. स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला त्रास देणे बंद करा, अशी पोस्ट करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यावर केली आहे. एकीकडे धाराशिवमध्ये हायवे टच जमीन घेण्याचा सिलसला सुरू, दुसरीकडे ‘साहेबांच्या रिसॉर्टसाठी जनतेच्या पोटावर ‘बुलडोझर’ अशी टीका केली.
धाराशिवमधील तामलवाडी टोलनाक्याजवळ दुकाने, हॉटेल आणि सार्वजनिक शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले आणि याच परिसरात पालकमंत्र्यांची जवळपास 20 एकर हायवे टच जमीन व रिसॉर्टचे काम सुरू आहे. गरीबांचा रोजगार उद्ध्वस्त करून, शेतकऱ्यांच्या जमिनींवर बुलडोझर चालवून नेमका कुणाचा मार्ग मोकळा केला जातोय ? असा प्रश्न सपकाळ यांनी केला.
अतिक्रमण हटवण्यासाठी तामलवाडीचाच एवढा ‘विशेष’ आग्रह का ? स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबाच्या पोटावर पाय हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय ? यांच्या रिसॉर्टचा धंदा तेजीत यावा म्हणुन टपरी ठेलेवाल्यांच्या पोटावर पाय, स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला त्रास देणे बंद करा, अशी पोस्ट सपकाळ यांनी सोशल मीडियावर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी भुमिका जाहीर केली मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी वैयक्तिक ‘हीत संबंध’ जपण्यात धन्यता मानत आहेत.
तामलवाडीसह येडशी, पारगाव, तलमोड या 4 टोल नाका शेजारी असलेली दुकाने, हॉटेल व सार्वजनिक शौचालय कारवाई करीत हटविण्याचे आदेश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले आहेत. ही दुकाने अतिक्रमण असुन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी त्यांची भुमिका आहे. सरनाईक यांनी तामलवाडी टोलनाक्यावर अतिक्रमण मुक्तीची शासकीय बैठक घेतली, त्यात त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्यासह अधिकारी, शिवसेना पदाधिकारी उपस्थितीत होते.
चौकट –
तामलवाडी येथील अनेक लोकांचा रोजी रोटी, रोजगार व व्यवसाय या दुकानावर अवलंबून आहे. पालकमंत्री सरनाईक यांची टोल नाक्याजवळ महामार्ग लागत 6 वेगवेगळ्या गटात 20 एकर जमीन आहे, त्यात भव्य दिव्य रिसॉर्टचे नियोजन असुन काम सुरु आहे. या रिसॉर्टची ‘शोभा’ टोल नाक्याजवळ असलेल्या दुकानामुळे व सार्वजनिक शौचालयामुळे कमी होणार असल्याने पालकमंत्री हा ‘राज हट्ट’ करीत असल्याचा आरोप होत आहे.
व्यापाऱ्यांनी व्यापार करायला हवा मात्र हाय वेवर स्वच्छता गृह नसावे. आयआरबीला जी जागा दिली आहे त्या जागेवर त्यांनी स्टॉल, दुकाने बांधायला हवीत. आयआरबीचे कार्यालय वातावरण कुलीत एसी आणि सर्वसामान्य जनता जी टोल पैसे देते त्यांना भर रस्त्याच्या कडेला शौचालय सुरु केले त्याचे ड्रेनेजचे पाणी कोणाच्याही शेतात सोडायचे हे असे चालणार नाही. तामलवाडी येथील काही शेतकऱ्यांनी मला निवेदने दिली आहेत त्यानुसार कारवाई करावी लागत असेल तर पालकमंत्री म्हणुन काही अधिकारांचा वापर करील असे सरनाईक म्हणाले.











