निष्ठावंतांचे तिकीट कापले, पत्नीला अध्यक्ष केले – विधान परिषदेला सुद्धा हव्यास होता, जशाच तसा मान सन्मान
धाराशिव – समय सारथी
धाराशिव भाजपात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरोधात नाराजीचा सुर असुन एकामागुन एक अशी खदखद बाहेर पडत आहे. ऍड अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य नंतर आता प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड व्यंकट गुंड यांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद निवडणुक बसवराज पाटील यांनी मिळविलेल्या विजयाबद्दल गुंड यांनी भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित केला असुन त्या कार्यक्रमात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. उमरगा येथे सुद्धा पाटील यांना स्थान नव्हते.
काळे यांच्या बाबतीत जे घडले ते निषेधार्य आहे, पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजप कार्यकर्ता लांब चालला असुन त्यांना हेच अपेक्षित आहे. त्यांना भाजपात कार्यकर्ता नको असुन राष्ट्रवादी प्रमाणे स्वतःचे वयक्तिक समर्थक हवे आहेत असे ऍड व्यंकट गुंड म्हणाले. योग्य वेळी यावर पत्रकार परिषद घेऊन बोलेन असे ते म्हणाले.
आमदार पाटील हे भाजप प्राईव्हेट लिमिटेड पक्ष असल्यासारखे चालवीत आहेत, भाजप ही राष्ट्रवादी पक्ष नाही. त्यांनी आमच्या सारख्या इतर ज्येष्ठ सदस्यांची जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद तिकीट प्रतिस्पर्धी होऊ नये म्हणुन जाणीवपूर्वक कापले. आम्हाला त्यांच्या दारात जायची गरज नाही, आमची रोजी रोटी त्यांच्यावर अवलंबून नाही. ते मान सन्मान देत नाहीत, त्यांना आम्ही मान कां द्यावा, जशास तसे उत्तर दिले जाईल असे ऍड गुंड म्हणाले.
पक्षाच्या सुरवातीपासुन आम्ही काम करीत असुन हे गेली काही वर्षात येऊन पक्ष चालवीत आहेत. रामदास कोळगे यांच्या सारख्या नेत्याचे तिकीट कापले. आमदार खासदार यांनी घरात जिल्हा परिषदेचे तिकीट द्यायचे असे आदेश असताना राजहट्ट करून पत्नीला अध्यक्ष बनविले, पक्षाचे आदेश डावलले, पक्ष याची दखल घेत असतो. विधान परिषदेला सुद्धा घरात उमेदवारी देण्याचा हव्यास होता मात्र पक्षाने बसवराज पाटील यांना संधी दिली. बोगस कामे, गुत्तेदार जपून त्यातून संपत्ती कमवायची. त्यांच्या सोबत काही लाचार व रोजगारी लोकांची फौज आहे असा आरोप केला.
मतभेद असू शकतात, पण ते संघटनेच्या योग्य व्यासपीठावरच मांडावेत. प्रसारमाध्यमांतून किंवा सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करणे टाळावे. संघटनेची शिस्त, पक्षाची प्रतिमा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिस्तीतूनच मजबूत संघटना आणी सक्षम नेतृत्व घडते. तुमची आमची, भाजपा सर्वांची अशी पोस्ट जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी केली होती मात्र नाराजीचा सुर कायम आहे.
आम्ही सर्वांनी 30 वर्ष संघर्ष केला असुन कोणी पक्षाचा मालक होण्याचे प्रयत्न करू नये मान सन्मान घ्यावा व मर्यादा पाळाव्यात. एकाच घरात 2 संविधानिक पदे, स्वतःच्या कुटुंबासाठी पायघड्या मग कार्यकर्तेनी आयुष्यभर सतरंज्या उचलायच्या का ? मुख्य पदाधिकारी यांचे फोटो न टाकणे म्हणजे मनाचा कोतेपणा दर्शवितो मात्र त्याने फरक पडत नाही असे चालुक्य म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ते जसे वागत होते तसे इथे वागत आहेत मात्र हे जास्त काळ चालणार नाही. कार्यकर्ते पेक्षा वैयक्तिक समर्थक वाढविण्यावर व पोसण्यावर भर दिला जात आहे. काही जणांचा राजकीय प्रतिस्पर्धी नको म्हणुन ठरवून पराभव केल्याचा आरोप चालुक्य यांनी केली.
पाटील यांचा धाराशिव जिल्ह्यात एक कलमी कार्यक्रम सुरु असुन त्यांच्या सरंजामशाहीला अनेक जण कंटाळले असुन आम्ही आता सगळ्यांची मोट बांधत आहोत असे काळे म्हणाले. निष्ठावंत कार्यकर्ते हे यांचे लाभार्थी नसुन त्यांना मान आणि सन्मान हवा आहे. आमचा संघर्ष व तपस्या अमुल्य आहे, असे काळे म्हणाले.











