धाराशिव – समय सारथी
कला केंद्र मुक्त धाराशिव सारखेच ड्रग्जमुक्त धाराशिव करण्याचा संकल्प पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी व्यक्त केला. मुंबईवरून येणारे काही लोक ड्रग्ज आणत आहेत अशी माहिती हाती आली असुन त्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ड्रग्ज मुक्त धाराशिव करायचे असुन कारवाई करताना कोणतीही भीड भाड ठेवू नका, ड्रग्जमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे त्यामुळे त्याला निस्तनाबुत करायचे आहे. ड्रग्जमध्ये आम्ही कारवाईत हस्तक्षेप करणार नाही, काही लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करतात मात्र आता साडे 3 वर्ष कोणत्याही निवडणुका नाहीत असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लागवला. तुळजापूर येथे ड्रग्ज कारवाई काही नेत्यांचा हस्तक्षेप झाला होता.
कला केंद्रामुळे तरुण पिढी बरबाद होत असुन काही जणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले त्यामुळे कलेच्या नावाखाली चुकीचे प्रकार करणारी कला केंद्र बंद झाली पाहिजेत अशी भुमिका घेतली व कारवाई करण्यासाठी सांगितले तेव्हा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता 6 कलाकेंद्र बंद करून धाराशिव जिल्हा कला केंद्र मुक्त करून दाखवला, त्यात त्यांचे योगदान मोठे आहे, त्याबद्दल पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही अधिकारी व त्यांच्या यंत्रणेचे आभार मानले.
पालकमंत्री असताना मला सुद्धा दबाव येत होता तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना किती दबाव येत असेल याची कल्पना येते मात्र त्यांनी कारवाई केली. अनेक लोकांची घरे व कुटुंब बरबाद होण्यापासून वाचवल्याने शेकडो माय माऊली यांचा आशीर्वाद यांना मिळेल असे पालकमंत्री म्हणाले.
छुप्या पद्धतीने कला केंद्र सुरु होणार नाहीत यासाठी पोलिसांना सुचना दिल्या असुन असे काही झाल्यास त्याचे व्हिडिओ मला व पोलिस अधीक्षक यांना पाठवा, ते बंद नव्हे तर कायमस्वरूपी निस्तनाबुत करू अशी ग्वाही त्यांनी दिली. नवीन कला केंद्र चालु करायला परवानगी देणार नाही आणि जी चालु होती ती बंद करण्यात आल्याने आमच्या दृष्टीने कला केंद्र हा विषय संपला आहे. कला जोपासण्यासाठी समाजात खुप काही गोष्टी आहेत, त्या करू व कला जोपासु आणि कलेला इतर माध्यमातुन प्रोत्साहन देऊ असे ते म्हणाले.











