धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 3 आरोपीना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या महिलेला धाराशिव येथील कोर्टाने 8 मार्चपर्यंत 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. संगीता गोळे या महिलेला मुंबईतुन अटक करण्यात आल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी 3 मार्चपर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता वाढीव 5 दिवस कोठडी दिली आहे. आता पर्यंत तिला 14 दिवसांची कोठडी मिळाली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज तस्करीत 12 आरोपी असुन 6 जण अटकेत आहेत तर 6 जण फरार आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत असुन ते स्वतः कोर्टात हजर राहिले व तपासाची माहिती दिली. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत असुन त्यांच्या युक्तिवादनंतर वाढीव कोठडी सुनावली.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, मुंबई येथील संतोष खोत,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे या 6 जणांना अटक केली आहे. स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे हे 2 आरोपी फरार आहेत तर 4 नावे गोपनीय आहेत. 3 जणांना 5 दिवसांची 20 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली व त्यानंतर 9 दिवसांची 1 मार्चपर्यंत अशी 14 दिवसांची कोठडी सुनावली त्यानंतर जेलमध्ये रवानगी केली आहे. संतोष खोत व विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. ड्रग्ज तस्करीत मोठे सिंडीकेट सक्रिय असल्याचा धाराशिव पोलिसांचा दावा आहे.