धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 3 आरोपीना धाराशिव कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची धाराशिव जेलमध्ये रवानगी केली आहे. आरोपी सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे या 3 जणांना पोलिसांनी 4 मार्च रोजी 17 पुड्या ड्रग्जसह अटक केली होती या आरोपीचे मुंबई येथील ड्रग्ज तस्कर यांच्याशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन बँक खाते व्यवहार व आरोपीचे संभाषण पोलिसांनी हस्तगत केले आहे, त्यामुळे यात अनेक बाबींचा खुलासा झाला आहे. हे आरोपी मुंबई सोबतच सोलापूर येथील ड्रग्ज तस्कर यांच्याकडुन ड्रग्ज खरेदी करीत असल्याचे समोर आले असुन सोलापूर लिंकमधील काही नावे निष्पन्न झाली आहेत. तिन्ही आरोपीना 17 मार्चपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती त्यांना आज कोर्टात हजर केल्यानंतर त्याना न्यायालयीन कोठडी देत धाराशिव जेलमध्ये रवानगी करण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात 16 आरोपी असुन त्यातील 9 जण जेलमध्ये आहेत, 1 जण पोलिस कोठडीत तर पिनू तेलंग व वैभव गोळे हे 2 जण फरार आहेत. 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवत ती डायरीत नमुद केली आहेत. संकेत शिंदे 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत आहे.
तपासात ड्रग्ज तस्करीचा उलघडा होत असुन आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. ड्रगज पेडलर व ड्रग्जचे सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर असुन सेवन करणाऱ्याच्या माध्यमातून ड्रग्ज पेडलर, तस्कर हाती लागतात का ? याचा शोध घेतला जात आहे. ड्रग्ज तस्करीचे 2 वेगवेगळे सिंडीकेट तुळजापुरात सक्रीय असुन पहिल्या घटनेत पोलिसांनी मुंबई कनेक्शन उघड करीत 14 फेब्रुवारी रोजी 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या जप्त केल्या यात पोलिसांनी सुरुवातीला 3 आरोपीना अटक केली आहे तर मुंबई कनेक्शनचा तपास करताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यावरून 4 मार्च रोजी तुळजापुरात 2 ठिकाणावरून 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या जप्त केल्या व 4 आरोपीना अटक केली.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 फेब्रुवारी,संतोष खोतला 27 फेब्रुवारी,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. यातील अरगडे, दळवी, राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे हे 9 जण जेलमध्ये आहेत. स्वराज उर्फ पिंटू तेलंग व वैभव मुळे हे 2 आरोपी फरार आहेत.सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना ड्रग्जसह 4 मार्च रोजी अटक करण्यात आली.
एकेकाळी कर्जबाजारी ते करोडोपती असा मुळे याचा प्रवास असुन पिंटूने तुळजापूरला सर्वप्रथम ड्रग्ज आणले. 3 वर्षापासुन तो व मुंबईतील टोळी तुळजापुरात तस्करी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासात पोलिसांना काही ठिकाणी सीसीटीव्ही, आरोपीच्या मोबाईलमधील ऑडियो रेकॉर्डिंग व चॅटिंग मिळाली आहे. आरोपीचे कॉल डिटेल्स व मोबाईलमध्ये झालेले एसएमएस संभाषण यासह अन्य पुरावे मिळाले असुन त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरु आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका स्पष्ट करीत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र तपास करीत आहेत.