धाराशिव – समय सारथी
जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनी केलेली कृती ही असंवेदनशीलता असुन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. महोत्सव रद्द करून जिल्हाधिकारी यांनी वेळ व पैसा पुरग्रस्त नागरिकांना द्यावा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी यांचे संसार उघड्यावर आले असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे दोघे तुळजापुर नवरात्र सांस्कृतिक उत्सवात एका गाण्यावर नाचत ठेका धरताना दिसले, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून टीका होत आहे.
जिल्हाधिकारी यांनी केलेली कृती ही असंवेदनशीलता आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे, गळफास घेत आहे इतकी भीषण स्तिथी दाहकता असेल तर प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी म्हणुन संवेदनशीलपणा असला पाहिजे आणि तो दाखवायला पाहिजे. शेतकऱ्यांचे आश्रू पुसायचे आणि दुसरीकडे असे वर्तन करायचे हे दुर्दैवी आहे. तुळजापूर महोत्सव तातडीने रद्द करावा आणि जे पैसे खर्च करणार आहेत, त्याचा अपव्यय टाळून तो पुरग्रस्त शेतकरी यांना द्यावा. त्यांनी त्यांचा अधिकचा वेळ हा पुराग्रस्तना शासकीय मदत कशी मिळेल यासाठी द्यावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांच्याकडून ओमराजे यांनी व्यक्त केली.












