आमदार सावंत उदघाटक, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील प्रमुख पाहुण्या तर ओमराजेंची उपस्थिती
धाराशिव – समय सारथी
परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा करण्याच्या उद्देशाने भूम- परंडा- वाशी विधानसभा मतदारसंघस्तरावरील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ शनिवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रामहारी मंगल कार्यालय, नगर रोड,भूम येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सध्याची राजकीय स्तिथी, कुरघोडीचे वातावरण, आरोप प्रत्यारोप पाहता व आमदार सावंत आणि अध्यक्षा अर्चना ताई पाटील या दोघांचा नैसर्गिक स्वभाव पाहता हे शिबीर तक्रार निवारणा ऐवजी वादाचा आखाडा बनू नये म्हणजे झाले. त्यात नुकतेच सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार ओमराजे यांची प्रमुख उपस्थिती भर टाकणारी ठरणार आहे.
सावंत हे सध्या पुण्यातुन सक्षमपणे कारभार पाहतात, ओमराजे दिल्लीत अधिवेशनाला आहेत त्यामुळे कोण कोण या कार्यक्रमाला येते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमदार सावंत यांनी लोकसभेत अर्चना पाटील यांना बहीण मानत विजयासाठी छातीची कोट करीत प्रण केला होता तर जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीत पाटील परिवाराने कुरघोडी करीत पुतणे धनंजय सावंत यांना फोडले. पाटील सावंत एकाच व्यासपीठावर नंतर आले नाहीत.
शिबिराचे उद्घाटन आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत,विधानसभा सदस्य, परंडा विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ अर्चनाताई पाटील अध्यक्षा,जिल्हा परिषद,धाराशिव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास लोकसभा सदस्य खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बसवराज पाटील विधान परिषद सदस्य,विक्रम काळे विधान परिषद सदस्य,सतीश चव्हाण विधान परिषद सदस्य,सौ.संयोगिता गाढवे नगराध्यक्षा,नगर परिषद भूम,कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी, धाराशिव,प्रियवंदा म्हाडदळकर मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव,रितू खोखर, पोलीस अधीक्षक,धाराशिव,सौ. पूजा ठोंगे,सभापती,पंचायत समिती भूम,सौ.अर्चना जाधव, सभापती,पंचायत समिती परंडा, सौ.प्रणिता गायकवाड,सभापती, पंचायत समिती वाशी,जाकीर म.इस्माईल सौदागर,नगराध्यक्ष, नगर परिषद परंडा तसेच सौ.विजयाबाई गायकवाड , नगराध्यक्षा,नगर परिषद,वाशी हे उपस्थित राहणार आहेत.
समाधान शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी भूम ज्योती चौहान,तहसीलदार भूम जयवंत पाटील,तहसीलदार परंडा निलेश काकडे आणि तहसीलदार वाशी प्रकाश म्हेत्रे यांनी नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रकरणे, महसुली सेवा तसेच नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.











