आमदार पाटीलांवर आरोप, तुळजापूरातही ‘लाडका ठेकेदार’, निवडणुकीत पैसे नेणारा ‘तो’ अधिकारी कोण?
धाराशिव – समय सारथी
जी कंपनी 156 कोटी रुपयांचे काम करू शकली नाही त्या कंपनीला तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचे 436 कोटी रुपयांचे काम देण्याचा घाट रचला जात असुन हे काम के एच कंपनीला मिळाल्यास आंदोलन, उपोषण करू. आम्ही कोणत्याही स्तिथीत यातून माघार घेणार नाही असा इशारा ऋषीकेश मगर व नगरसेवक अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला यावेळी त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. तुळजापूर निवडणुकीत एका वरिष्ठ अधिकारी यांच्या सुरक्षेत पैसे आणले गेले याची पोलखोल करणार असल्याचे ते म्हणाले.
खंडोबा बिरादार यांच्या के एच कॅन्स्ट्रकशन छत्रपती संभाजीनगर ह्यांना नगर परिषद निवडणुकीपुर्वी 2024 मध्ये नगरोत्तथान अंतर्गत 156 कोटी रुपयांचे काम दिले होते, त्यावेळी 2 निविदा आल्या होत्या. 5 टक्के कमी दराने काम केले. त्यांना 15 कोटी ऍडव्हान्स देण्यात आला. त्यांनी 30-35 कोटीचे काम केले त्यांना त्याचे बील सुद्धा देण्यात आले मात्र त्यांनी काम बंद केले, गेली दीड वर्षापासुन काम बंद आहे. सगळी यंत्रणा घेऊन ते निघुन गेले. 156 कोटी रुपयांचे काम घेण्यासाठी अनेक बोगस कागदपत्रे जोडली आहेत, देय बँक व्यवहार पुरावा नाही, सारा सोबत केलेले पोट करार नाही. राजकीय दबावापोटी काम मंजुर करून देण्यात आले.
निर्मनुष्य वस्ती व ज्या ठिकाणी एकही घर नाही त्या ठिकाणी रस्त्याची कामे करण्यात आली. खासगी लेआऊट आहे त्या ठिकाणी ही कामे झाले, प्लॉटिंग विकासकाने रस्ते नाली करण्याचा नियम आहे मात्र तिथे नगर परिषदेने काम केले. जिथे गरज आहे तिथे काम केले नाही. हुतात्मा स्मारक, नवीन न्यायालय येथील रोड केले नाहीत. प्राधिकरणचा निधी सरकारने काढुन घेतला आहे.
ह्याच कंपनीला पुन्हा 436 कोटी रुपयांचे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम देण्याचा घाट आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी घातला आहे. ज्या कंपनीने 156 कोटीचे काम केले नाही त्यांना पुन्हा हे काम का ? निधी उपलब्धता नसताना घाई केली जात आहे. नगरोत्तथानमधील कंपनी तीर्थक्षेत्र विकासात आहेत. या कंपनीला काम देण्यात विशेष रस दिसत असुन ठेकेदार लॉबी ते जपत आहेत त्यांना विकासाचे देणे घेणे नाही. आम्ही गप्प बसणार नाहीत यात आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप केला मगर यांनी केला. काम रद्द करून दंड करावा व काळ्या यादीत टाकावे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना याबाबत पुजारी, नागरिक घेऊन भेटणार असल्याचे ते म्हणाले, हा श्रद्धेचा विषय असुन जनतेचा पैसा आहे. जितका निधी उपलब्ध आहे त्याच प्रमाणात कामे हाती घ्यावी. 70 हजार कोटीची देयके देणे बाकी आहे. आमदार पाटील यांचा राजकीय दबाव असल्याने तुळजापूर येथे दुसरी कंपनी यायला तयार नाही. खुली निविदा असली तरी अनेक गोष्टी मॅनेज केल्या जात आहेत.
जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकीवेळी कोणत्या शासकीय यंत्रणेच्या गाडीत पैसे तुळजापूरमध्ये आले, याची पोलखोल पुराव्यासह देणार असुन त्यातील एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सुरक्षेत हे पैसे आणले गेले असा गंभीर आरोप केला त्यामुळे तो अधिकारी कोण ? याची चर्चा सुरु झाली आहे. कोणीतरी यावर बोलले पाहिजे.
मंदिरात पुरातत्व विभागाचे काम सुरु असुन अनागोंदी कारभार सुरु आहे. नगर परिषदेला जे यात्रा अनुदान मिळते त्यातून सुविधा करणे गरजेचे होते, ठीकठिकाणी मराठी, कन्नड, तेलगूसह इतर भाषेत दिशा दर्शक बोर्ड लावणे गरजेचे होते मात्र तसे केले नाही. काही ग्रामीण भागातील तरुण पुजारी म्हणुन येतात व भाविकांची लुट करतात याबाबत लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले. आराखडा बाबत संभ्रम असुन लोकांना माहिती द्यावी, आम्ही लोकांपर्यंत विषय मांडले त्याचे उत्तर आमदारांनी भाविकांना द्यावे.











