धाराशिव – समय सारथी
शेतकरी कर्जमाफी घोषणेच काय ? असा प्रश्न करीत आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ पोस्ट करुन फडणवीस यांना त्यांनी केलेल्या घोषनेची आठवण करुन दिली आहे. मुख्यमंत्री यांनी आज तुळजापूर येथे कर्जमाफीची घोषणा करावी असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक पोस्ट करुन केले आहे.
मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीत आमदार कैलास पाटील यांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण धाराशिव जिल्ह्यात येत आहात, यानिमित्ताने आपल्याला एक महत्त्वपूर्ण आठवण करून देऊ इच्छितो.. निवडणुकीच्या प्रचारावेळी आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती.. तसा निर्णयही आपल्या तत्कालीन सरकारने घेतला असल्याचे शब्द तुमचेच होते.. माझ्या धाराशिवसह तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या या शब्दावर विश्वास टाकून आपल्या पदरी भरभरून यश दिले. आता तो शब्द पाळण्याची नैतिक जबाबदारी तुमचीच आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या विश्वासाचा घात न करण्याची जबाबदारी तुमचीच आहे.
आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र दरबारातून आपण संपूर्ण कर्जमाफीची घोषणा तुम्ही आज कराल व आपल्या शब्दाला जागाल, अशी आशा धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना लागून आहे. शेतकऱ्याविषयी आपले प्रेम खरे असेल तर आपणच केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी करण्यासाठी वाट कसली पाहताय ? असे पोस्ट केले आहे.