धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी गौरी व कालिका या 2 कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केल्याच्या आदेशाची महसूल व पोलिस विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी अंमलबजावणी केली. पंचनामा करून या ठिकाणी असलेल्या रूम व प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेले लेखी आदेश अप्राप्त असल्याचे ‘कायदेशीर’ कारण पुढे करीत ही कलाकेंद्र सुरुच होती. कला केंद्र चालकांनी नियमावर ‘बोट’ ठेवल्यानंतर प्रशासनानेही तात्काळ कारवाई करीत आदेशाची अंमलबजावणी करून ‘सील’ केले.
एरव्ही डीजे, बंद खोलीत नृत्यसह अनेक नियमाचा सर्रास ‘भंग’ करणाऱ्या कला केंद्र चालकांनी ‘सजग’ होत प्रशासनाच्या कायदेशीर मुद्यावर ‘बोट’ ठेवत ‘नियम’ शिकवला मात्र प्रशासनानेही नियमानुसार कारवाई करीत सर्व रूम सील करून त्या बंद केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी संजय पाटील, तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस पथकाने कारवाई केली.
आम्हाला आदेशच मिळाले नाहीत, मग काय? जिल्हाधिकारी यांनी कधी परवाना रद्द केला हे माहिती नाही, बातमीतुनच कळाले आहे. आम्हाला आदेश मिळाले नाहीत त्यामुळे आम्हाला ते कायदेशीर बंधनकारक नाहीत त्यामुळे आम्ही कला केंद्र सुरु ठेवली अशी ‘ठोस’ भुमिका घेतली होती.
जिल्हाधिकारी यांनी 17 सप्टेंबर रोजी आदेश काढले होते, दिवाळी असल्याने एकच कामकाजाचा दिवस होता. दिवाळी व पुरग्रस्त शेतकरी मदत या कामात प्रशासन गुंतलेले असताना आदेश कला केंद्राना मिळाले नाहीत, नेमक्या याच दिरंगाईचा ‘फायदा’ कला केंद्र चालक मालक यांनी घेतला. आम्हाला काहीच माहिती नाही, जसे काही घडलेच नाही या भूमिकेत राहून कला केंद्र सुरु ठेवले त्यामुळे प्रशासन चांगलेच तोंडावर पडले आहे.
तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका अश्या 5 केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असुन कालिका, गौरी, साई व पिंजरा ही 4 कला केंद्र पंचनामा करून ‘सील’ केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तुळजाई कला केंद्राने ‘आव्हान’ दिले असुन आता हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्ताच्या कोर्टात जाणार आहे. नर्तिका पुजा गायकवाड ही आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. तिथे पोलिस व महसूल विभागाची भुमिका व म्हणणे महत्वाचे आहे. या निर्णयावर इतर केंद्राचे भवितव्य ठरणार आहे.
अनेक कुटुंब उध्वस्त व तरुणाई आहरी जात असल्याने धाराशिव जिल्हा कला केंद्र ‘मुक्त’करण्याचा संकल्प पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी केला आहे. प्रशासनातील काही, स्थानिक व गाव पुढारी यांचा मात्र कायम आशीर्वाद आहे. महाकाली या केंद्रचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असुन या कला केंद्र बाबत प्रकरण उच्च न्यायालयात असुन तिथे शपथपत्र दिले जाणार आहे.
काही कला केंद्रावरील महिला खुन, आत्महत्यास प्रवृत्त केल्यासह पिटा अनैतिक गुन्ह्यात अडकल्या असुन तसे गुन्हे नोंद आहेत, या सगळ्यांची जंत्री तयार करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. कायदेशीर बाबी कोर्टासह अपील अधिकारी यांच्याकडे मांडणे हे प्रशासनासाठी महत्वाचे ठरणार आहे. कला केंद्र चालक यांना केंद्र सुरु करण्याची घाई असुन ‘धावपळ’ सुरु आहे, त्यांनी नियमावर ‘बोट’ ठेवायला सुरुवात केली आहे.












