धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात सरकार पक्ष व आरोपी पक्षाच्या वतीने सर्व साक्षी पुरावे संपल्यानंतर अंतिम युक्तिवादाला 25 ऑगस्ट आजपासुन सुरुवात होणार आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने सीबीआय केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाचे विशेष सरकारी वकील एजाज खान हे अंतिम युक्तिवाद सादर करतील. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे.
हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावे असे पत्र मुंबई उच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान मुंबई ट्रायल कोर्टाला दिले आहे. माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने यात मुख्य आरोपी केले असुन कट रचुन हत्या केल्याचा ठपका ठेवला आहे. दुहेरी खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन सुनावणी सुरु आहे.सर्व 9 संशयीत आरोपी जामीनावर आहेत.
डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावतीने ऍड भुषण महाडिक हे बाजू मांडत आहेत तर इतर 8 आरोपींच्या वतीने ऍड नेहा सुळे ह्या बाजु मांडत आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी याचिका दाखव केल्याने त्यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे बाजु मांडत आहेत. यापुर्वी जानेवारी महिन्यात आरोपीच्या वतीने अंतिम युक्तिवाद झाला होता मात्र डॉ पाटील यांनी 3 साक्षीदार तपासण्याची विनंती केली त्यानुसार ती देण्यात आल्याने प्रकरण लांबले.
फौजदारी खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सर्वप्रथम सरकारी वकील आपला अंतिम युक्तीवाद सादर करतात, त्यात साक्षीदारांचे जबाब व पुरावे, वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक व बॅलेस्टिक अहवाल, मोबाईल व इतर तांत्रिक पुरावे,पंचनामा व परिस्थितीजन्य पुरावे मांडत गुन्ह्यात समोर आलेल्या पुराव्यांची साखळी जोडत आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. सरकारी पक्ष प्रथम युक्तिवाद मांडतो, कारण गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यानंतर बचाव पक्ष म्हणजे आरोपीचे वकील बाजू मांडतात. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांना व आरोपांना खोडून काढण्याचा प्रयत्न आरोपीचे वकील करतात. आरोपींच्या वतीने नवीन कायदेशीर मुद्दा किंवा तांत्रिक बाब मांडली असल्यास न्यायालय सरकारी वकीलाला संधी देते.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही.
पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांच्या याचिकेनंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना मुख्य आरोपी करीत राजकीय द्वेषातुन हत्या झाल्याचा ठपका ठेवत 9 जणांच्या विरोधात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली.याच तपासात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट व सुपारी 30 लाखात दिल्याचे उघड झाले.
दुहेरी हत्याकांडात आरोपी पारसमल बादला उर्फ जैन हा माफिचा साक्षीदार बनला आहे त्याला सुरुवातीला 25 मे 2009 रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचं दिवशी 25 मेला शुटर दिनेश तिवारी, 30 मे ला मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, 31 मे ला लातुर येथील सतीश मंदाडेला अटक झाली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना मुंबईतुन अटक केली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली. शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन सुनावणीच्या अंतिम टप्प्यात जामीन मिळाला आहे.