धाराशिव – समय सारथी
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांचे सेवेतून निलंबन केल्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी शेळके यांच्या खाते अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोकर यांनी दिली. लाच प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, सर्वांना सक्त सुचना देण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. 95 हजार लाच प्रकरणात शेळके हे सध्या धाराशिव जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. शेळके यांच्या बाबतीत अनेक तक्रारी असुन एका प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका प्रकरणाचा तपास आनंद नगर पोलिसांकडे वर्ग केल्याचेही खोखर यांनी सांगितले.
आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात एका आरोपीवर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 95 हजार स्वीकारल्या प्रकरणी धाराशिव लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार मुक्ता लोखंडे यांना अटक केली आहे. शेळके व लोखंडे या जोडीने एका सहकारी पोलिस महिलेकडुन लाच घेतली हे विशेष. सुरुवातीला 2 लाख मागितले, त्यानंतर 1 लाख मागुन 95 हजारात तडजोड केली.
आनंदनगर पोलीस ठाणे गुरनं 235/2025 कलम 7, 7 (अ), 12 भ्रष्टाचार अधिनियम सन 1988 अन्वये गुन्हा दाखल असल्याने त्यांना 27 जुन 2025 रोजी निलंबित करण्यात आले आहे. लाच घेतानाची कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश वेळापुरे, निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी केली. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव यांचे मार्गदर्शन लाभले.