धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी स्थगितीबाबत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित स्थिगिती उठवावी अशी विनंती केली आहे. निधी वाटपावेळी सर्व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले होते, जुन्या पालकमंत्री सुत्रानुसार निधी दिला त्यावेळी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आक्षेप घेतला नाही मात्र नंतर अजित पवार यांच्या माध्यमातून तक्रार केली व स्थगिती दिली. नंतरच्या कालावधीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माझ्याशी यासंदर्भात कोणताही संवाद साधलेला नाही, तसेच मी केलेल्या संपर्क प्रयत्नांनाही प्रतिसाद दिलेला नाही. सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत स्थगिती उठवावी असे पत्र त्यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या जानेवारी २०२५ च्या पहिल्याच बैठकीत सर्व महाराष्ट्र सर्वसदस्यांच्या संमतीने निधीच्या वितरणाबाबत सविस्तर चर्चा होऊन त्यानुसार धाराशिव मधील सर्व मतदार संघामध्ये विकास कामांसाठी निधीचे नियोजन करण्यात आलेले होते. सदर बैठकीत तुळजापूरचे स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यावेळेस निधी वितरणाबाबत कोणताही आक्षेप नोंदवलेला नव्हता. तथापि अर्थसंकल्पीय अधिवेशन काळाच्या दरम्यान निधी वितरणाबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व आपल्याकडे तक्रार करून निधी वितरणाबाबत आक्षेप नोंदविला होता, त्याअनुषंगाने संबंधित निधी वितरणावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व आपल्या संमतीने स्थगिती देण्यात आली होती.
धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०२४-२५ चा उर्वरीत निधी हा तत्कालीन पालकमंत्री महोदयांच्या कार्यकाळातील निधीपैकी उर्वरीत निधी होता. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचे अवलोकन केले असता, धाराशिव जिल्हा वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०२४-२५ चे निधी वितरण शिल्लक राहिले नव्हते. सदर निधीचे वितरण तत्कालीन पालकमंत्री महोदयांनी ज्या सुत्राच्या आधारे धाराशिव जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय केले होते, त्याच सुत्रानुसार मी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय निधीचे वितरण केले आहे. सर्व सदस्यांच्या संमतीने पुर्वांच्या सूत्रानुसार केलेले होते.
सदर निधी वितरणाची स्थगिती लागू झाल्यानंतरच्या कालावधीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माझ्याशी यासंदर्भात कोणताही संवाद साधलेला नाही, तसेच मी केलेल्या संपर्क प्रयत्नांनाही आमदार पाटील यांनी प्रतिसाद दिलेला नाही. अर्थमंत्री, अर्थ विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर सदर निधी वितरण स्थगितीबाबत ३-४ वेळा चर्चा होऊनही अद्यापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.
धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा (Aspirational District) असून सदर निधीच्या स्थगितीमुळे मागील तीन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध विकास कामे (आरोग्य, शिक्षण, महिला व बाल विकास, जलसंधारण व महावितरण विभागांच्या अत्यावश्यक योजनांची कामे) निधीअभावी रखडली असून ती जनता तथा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनमानाशी संबंधित आहेत, या जिल्ह्याचा मागासलेपणा लक्षात घेता ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.
महाराष्ट्रात आपल्या सक्षम नेतृत्वात महायुतीचे सरकार असून सदरचे सरकार हे विकास कामांना स्थगिती देणारे सरकार नसून विकास कामांना प्राधान्य देणारे सरकार आहे, अशी धाराशिव जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेत सरकारविषयी धारणा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून स्थगिती उठविण्याबाबत वारंवार पालकमंत्री या नात्याने माझ्याकडे विचारणा होत आहे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निधी वितरणावरील स्थगिती उठवून निधी वितरण होणे अत्यावश्यक आहे. सदर निधी वितरण व स्थगिती उठविण्याबाबत उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांना विनंतीपूर्वक पत्र सादर करण्यात आले आहे. परंतु, अद्याप सदरबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
धाराशिव जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व विभागांच्या कामांवरील स्थगिती तात्काळ उठवावी व निधी वितरणाची प्रक्रिया कशा प्रकारे राबवायची याबाबत स्वयंस्पष्ट मार्गदर्शक सूचना आपल्या मार्गदर्शनाखाली द्याव्यात, अशी विनंती धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपणांस करीत आहे, जेणेकरून धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळून संबंधित योजनांची मंजूर कामे त्वरीत सुरु होण्यास मदत होईल असे पत्रात नमुद केले आहे.