धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करी प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 10 जुन रोजी मंगळवारी मुंबई येथे भेट घेणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर,परंडा व बार्शी येथे ड्रग्ज तस्करीबाबत गुन्हे नोंद असुन यात सराईत गुन्हेगार, काही स्थानिक राजकीय नेते व प्रतिनिधी आरोपी म्हणुन अडकले आहेत. ड्रग्जबरोवर गांजा तस्करी, मटका, सट्टा व चक्री या गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग आहे.
ड्रग्जचे रॅकेट समुळ नष्ट करावे व संपत्ती जप्त करुन आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी यासह अन्य मागण्या आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील तपास आणि वस्तुस्तिथी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार आहेत. 4 जुन रोजी ओमराजे व आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे ते भेटणार आहेत.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीना अभय दिल्याचा खासदार ओमराजे यांचा आरोप आहे. मुंबई, सोलापूर येथील आरोपींसह तुळजापूर येथील इतर नावे जबाबात येऊनही कारवाई न करणे, 17 फरार आरोपी, आमदार कैलास पाटील यांचे लक्षवेधी उत्तर लीक, तस्कर व सेवन असे 2 गट करणे, विनोद गंगणे याला थेट पुरावे असताना पाठीशी घालणे व सेवन गटात सहभागी करणे, मकोका न लावणे, दोषारोप पत्रातील अन्य त्रुटी व जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष यासह अन्य मुद्दे त्यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रेसह मांडले होते. ड्रग्ज माफियाला मदत किंवा त्यात कोणी सहभागी असल्याचे आढळून आल्यास थेट बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळात दिला आहे.
धाराशिव येथील कोर्टाने तपास अधिकारी गोकुळ ठाकुर यांना काही मुद्यावर धारेवर धरतं प्रश्न विचारले होते, तपासात राजकीय दबाव व एका पक्षाचे प्रतिनिधी असल्याने गंगणे यांना सेवन गटात टाकले? यासह अन्य प्रश्न विचारले होते, त्यावर ठाकुर निरुत्तरीत झाले. खासदार ओमराजे यांनी देखील राजकीय दबाव असल्यासह काही प्रश्न उपस्थितीत केले होते. मुख्यमंत्री यांना भेटल्यावर काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे, दरम्यान तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीचे सूत्रधार विनोद गंगणे हे असल्याचा दावा कोर्टात केला आहे, 12 लाखांचे व्यवहार इतर मुद्दे मांडले असुन त्यांचे 2 गहाळ मोबाईल व इतर बाबीचा तपास सुरु आहे. गंगणे यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पुढाकार घेत विनोद गंगणे यांना व्यसनमुक्त करीत मन व मतपरिवर्तन केले व पोलिसांना ड्रग्ज विक्रीची ‘टीप’ दिली, हे ‘पुण्याचे’ काम केले असले तरी त्यांना ड्रग्ज तस्करी व विक्रीबाबत आधीच माहिती होती, 1 वर्ष ते लोकसभा, विधानसभा निवडणुका होईपर्यंत शांत राहिले यात राजकीय ‘स्वार्थ’ होता. या काळात त्यांनी पोलिसांना सांगितले नाही. निवडणुक प्रचारात महिलांनी आमदार पाटील यांच्याकडे ड्रग्जची व्यथा मांडली असे आमदार स्वतः सांगतात मग त्याचं वेळी पोलिसांना का सांगितले नाही, निवडणुका होईपर्यंत वाट का पाहिली? विधानसभेत राणा यांनी का मुद्दा मांडला नाही, लक्षवेधी उत्तर का लीक केले? हे खासदार ओमराजे यांनी विचारलेले प्रश्न कायम आहेत.