धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात एक मोठी बातमी हाती आली असुन पोलिसांनी ठोस कारवाईला सुरुवात केली आहे. ड्रग्स प्रकरणात आरोपीच्या संख्येत वाढ झाली असुन तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग व मुंबई येथील तस्कर संगीता गोळे यांना यात आरोपी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. हे अट्टल आरोपी आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपींची 5 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज 20 फेब्रुवारी रोजी धाराशिव येथील कोर्टात हजर करण्यात आले, त्यावेळी पोलिसांनी कोर्टात तपासाचा अहवाल व रिमांड दाखल केले त्यात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. पोलिसांनी 9 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, त्यावर न्यायाधीश यांनी 9 दिवसांची 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडली. सपोनि गोकुळ ठाकुर यांनी स्वतः कोर्टात हजर राहत तपासाची प्रगती व इतर माहिती कोर्टाला दिली. धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे सिंडीकेट असल्याचा संशय व्यक्त करीत ते तपासण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडी मागण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात अटक केलेले 3 व नंतर 2 असे 5 आरोपी झाले असुन त्यातील 2 आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत.
ड्रग्ज तस्करीबाबत राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आक्रमक भुमिका घेतली असुन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांना कारवाईसाठी 72 तासांचा अल्टीमेटम दिला होता. ड्रग्ज तस्करीत पोलिस व राजकीय नेता सहभागी असल्यास त्याला जेलमध्ये घालणार असे सांगत त्यांनी थेट कारवाई करा असे आदेश दिले, त्यानंतर पोलिस यंत्रणा सक्रीय झाली असुन त्यांनी तपासाची गती वाढवली आहे. ड्रग्स तस्करीचा नायनाट करण्याची पालकमंत्री म्हणुन जबाबदारी माझी आहे, पोलिसांनी कारवाईचा अहवाल द्यावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे असे म्हणत पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आक्रमक झाले. स्थानिक नेत्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उघड झाले. तुळजापुरात विक्रीसाठी येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात पोलिसांना यश आले. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना अटक केली असुन ते अट्टल गुन्हेगार आहेत. धाराशिव न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांना 20 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर केले गेले. ड्रग्ज प्रकरणात मुंबई येथील एका महिलेचे नाव समोर आले असुन हे ड्रग्ज तुळजापूर कोणाला विकले जाणार होते याचा तपास पोलीस करीत असुन ड्रग्ज खरेदी करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा धाराशिवचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने कारवाई केली. तामलवाडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.