धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी या दुहेरी हत्याकांडात सुरुवातीला महाराष्ट्र पोलिस त्यानंतर सीबीआयने तपास केला. माफीचा साक्षीदार बनलेला संशयीत आरोपी पारसमल जैन कोर्टात दिलेल्या जबाबात मुंबईचे तत्कालीन सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह त्यांच्या टीमवर गंभीर आरोप केले. अवैध कोठडीत ठेवणे, कबुली दिलेली असताना ती लपवून ठेवणे, खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासह अन्य आरोप जैनने केले. हत्याकांड पुर्वी व नंतर जैनच्या या आरोपामुळे मारिया यांची भुमिका वादग्रस्त बनली. सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भुमिका महत्वाची राहिली. युक्तीवाद संपला असुन 24 मार्चला कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यादिवशी कोर्ट निकालाची तारीख जाहीर करू शकते.
पवनराजे हत्याकांडात कबुली दिल्यानंतर मारिया यांनी अनेक बाबी लपवल्या, जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला व खोटे गुन्हे नोंद करून दबाव आणला असा आरोप जैन याने केला. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए एल यावलकर व डी पी शिंगाडे यांच्या समोर त्याने जबाब दिला, त्यात अनेक खुलासे केले. डॉ पाटील यांना अटक केल्यानंतर धाराशिवला येऊन ऋषीराज सिंग यांनी तपास केला, त्यावेळी डॉ पाटील समर्थकांनी प्रसार माध्यमाच्या गाडीवर हल्ला करीत तोडफोड केली होती.
हत्याकांड दाबण्यासाठी कोण कोण ? काय काय केले हे माहिती होते, तसे पुरावे सुद्धा होते मात्र कै पवनराजे व समद काझी यांची हत्या कोण व का केली हे जगासमोर येणे त्यावेळी महत्वाचे होते. विषयांतर होऊ नये यासाठी सगळे सहन केले. मारेकऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत न्यायालयीन लढा लढू व जिंकू, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.
जैन याच्या जबाबानुसार पवनराजे यांच्या हत्येपुर्वी तो, मोहन शुक्ला व सतीश मंदाडे भेटले, त्यानंतर तो व मंदाडे डॉ पाटील यांच्या मलबार हिल येथील घरी गेले. तिथे मंदाडे व डॉ पाटील यांनी पर्सनल चेंबरमध्ये 30-35 मिनिट चर्चा केली त्यानंतर ते हॉलमध्ये आले. डॉ पाटील यांनी मला वर खाली पाहत विचारले तु कोण आहेस ? त्यानंतर मंदाडे याने सांगितले की मी डॉ पाटील यांना बोललो आहे तु पवनराजे यांची हत्या कर. यानंतर आम्ही गाडीत बसून राकेश मारिया यांच्या कार्यालयात गेलो तिथे मारिया यांना मंदाडे याने स्कॉच बॉटल दिली. मंदाडे व त्यांना काही वयक्तिक बोलायचं असल्याने मारिया यांनी मला बाहेर थांबायला सांगितले. 20-25 मिनिट ते चेंबरमध्ये होते त्यानंतर मारिया बाहेर आली व त्यांनी मला वरून खालीपर्यंत पाहिले, नंतर आम्ही ऑफिसबाहेर आलो.

राकेश मारिया यांनी 5 मे 2009 रोजी सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग यांना पत्र दिले त्यानुसार जैन व तिवारी याने 19 एप्रिल 2009 ला हत्याकांडाची कबुली दिली मात्र मुबंई येथे बंदोबस्त, अलर्ट व इतर बाबीमुळे कळवण्यास उशीर झाला, असे लेखी कारण दिले. राज्यभर गाजलेल्या हत्याकांड सारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीनी कबुली देऊन, एका माजी गृहमंत्री यांचे नाव समोर आलेले असताना तब्बल 15 दिवसांनी मारिया यांनी पत्र दिले, अश्या काही बाबीमुळे संशय निर्माण झाला. पारसमल जैन याची मुलगी वर्षा हिने 27 एप्रिल 2009 रोजी सीबीआयला पत्र दिले त्यानंतर मारिया यांनी सावध भुमिका घेत 5 मे ला जैन व दिनेश तिवारी यांनी गुन्हा कबुल केल्याचे पत्र दिले.
हत्याकांडनंतर डॉ पद्मसिंह पाटील यांना वाचवण्यासाठी मी गप्प राहावे म्हणून 3 वेगवेगळ्या गुन्ह्यात मारिया यांच्या टीमने गुंतवले मात्र एकामागून एक खोटे गुन्हे नोंद होत असल्याने पवनराजे हत्याकांडाचे ‘बिंग’ मुलगी वर्षा मार्फत सीबीआयला ‘पत्र’ लिहून उघड केले असल्याचे जैन याचे म्हणणे आहे. 3 जुन 2006 रोजी मुंबई येथील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर व समद काझी यांची हत्या झाल्यानंतर 8 फेब्रुवारी 2009 पर्यंत जवळपास 2 वर्ष 8 महिने सगळे काही अलबेल होते, 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे सोपवुनही 3 महिन्यात आरोपी किंवा कोणताही धागादोरा हाती लागला नव्हता.
जैन याच्या 1 सप्टेंबर 202 च्या कोर्टातील जबाबानुसार, तो 8 फेब्रुवारी 2009 रोजी रात्री 9 वाजता मुंब्रा येथील एका क्लबवर पत्ते खेळण्यासाठी गेला, तेव्हा तिथे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला व त्याला पकडले.त्यानंतर त्याने किती दरोडे टाकले याबाबत चौकशी सुरु केली. मी दरोडा नाही तर पवनराजे यांचा खुन केल्याची कबुली देत डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वांची नावे सांगितली आणि इथूनच मारिया यांची टीम सक्रीय होत खरा ‘खेळ’ सुरु झाला.
दुसऱ्या दिवशी कुर्ला गुन्हे शाखेत घेऊन गेल्यावर पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड जैनला म्हणाले की, पारस तु खुप नशीबवान आहेस. आम्ही तुझ्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला नाही. मारिया यांच्यावर शरद पवार म्हणजे ‘बाबा’, अजित पवार ‘दादा’ ,गृहमंत्री जयंत पाटील, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा दबाब आहे. पद्मसिंह पाटील हे लोकसभेची निवडणुक लढवणार असुन ते जिंकले तर केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येईल तेव्हा आम्ही तुझ्यावर खुनाचा गुन्हा नोंद करणार नाहीत म्हणून तोपर्यंत आर्म ऍक्टचा गुन्हा नोंद करतो म्हणुन 25 फेब्रुवारी 2009 रोजी गुन्हा नोंद केला. त्यात त्याला 9 मार्च 2009 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली नंतर लगेच 9 मार्चला जैन व दिनेश तिवारीवर दरोड्याचा गुन्हा त्यानंतर 13 एप्रिलला चोरीचा गुन्हा नोंद केला, त्याला त्यांना 20 एप्रिल पोलिस कोठडी मिळाली.
पोलिस कोठडीत पोलिस निरीक्षक दिनेश कदम म्हणाले की, तुम्ही जामिनीसाठी अर्ज करू नका अश्या मारिया यांच्या सुचना आहेत. मी दरोडा, चोरी केली नाही मग गुन्हा का ? तुम्ही मला, डॉ पाटील व इतर आरोपीना खुनाच्या गुन्ह्यात का अटक करत नाहीत? डॉ पाटील यांना अटक कधी करणार ? तेव्हा कदम म्हणले की आम्ही दरोडा गुन्ह्यात पर्याप्त पुरावा नसल्याने 169 फायनल करणार आहोत व तुला जमीन देऊ मात्र तु विधानसभा निवडणुका संपेपर्यंत शांत रहा. कोणाला काही बोलू नकोस. डॉ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे विधानसभा निवडणुक लढवणार असुन त्याचा निकाल लागला की आम्ही तुला जामिनावर सोडू. 3 पैकी काही गुन्हे नंतर फायनल झाल्याने जैनच्या दाव्याला काही प्रमाणात पुष्टी मिळते.
पारसमल जैन याने मारिया व त्यांच्या टीममधील मिलींद गायकवाड,प्रवीण भगत,अनिल वडवणे,दिलीप रुपवते,दिनेश कदम यांच्यासह अन्य जणावर डॉ पदमसिंह पाटील याना वाचवण्यासाठी हत्याकांड दडपून ठेवल्याचा आरोप केले आहे, जे की गंभीर आहेत.
25 मे 2009 ला पारसमल जैन व शुटर दिनेश तिवारीला पवनराजे हत्याकांडात अटक केली त्यानंतर त्याने न्यायाधीश श्रीमती एस बी महाले यांच्या कोर्टात कबुली जबाब दिला. 31 मे ला मंदाडे व शुक्लाला तर 6 जुन 2009 ला डॉ पाटील यांना अटक केली, 25 सप्टेंबर 2009 रोजी जामीन मिळाला. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना मुख्य आरोपी करीत राजकीय द्वेषातुन हत्या झाल्याचा ठपका ठेवत 9 जणांच्या विरोधात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. त्यानंतर सविस्तर तपास करून 4 जुन 2010 रोजी पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले.











