धाराशिवच्या प्रकरणाची घेतली दखल – महिलेवर 4 कला केंद्रावर अत्याचार, रॅकेटमध्ये सहभाग कोणाचा ?
धाराशिव – समय सारथी
4 कला केंद्रावर एका विवाहित महिलेला कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याचा धाराशिव येथील गंभीर प्रकाराची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी घेतली आहे. धाराशिव, सोलापुरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक प्रकारांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असुन कारवाईची मागणी केली आहे.
सोलापूर, धाराशिव, बीड, पुणे, अहिल्यानगर तसेच नाशिक, जालना आदी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी स्तरावर कला केंद्रांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र, या केंद्रांमध्ये लोककलेचे सादरीकरण होण्याऐवजी त्याच्या आडून मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा, महाकाली आणि साई कला केंद्र तसेच लातूर जिल्ह्यातील बुधोडा कला केंद्र येथे महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलल्याच्या तक्रारी समोर आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही कला केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कला केंद्रांची अचानक आणि वारंवार महिला पोलीसांच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी डॉ गोऱ्हे यांनी केली आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुलींना फसवून आणले जात आहे का, याचीही सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
अनैतिक व बेकायदेशीर प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
धाराशिव येथील पिडीत महिलेला कला केंद्रात बळजबरीने डांबून ठेवुन मारहाण करण्यात आली. ग्राहकांसोबत पैशाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. या प्रकरणात कला केंद्रवरील आणखी कोणी सहभागी आहेत का ? इतर कोणावर अत्याचार झाला आहे का ? यांचा तपास होणे गरजेचे आहे. या प्रकरणात लॉज मालक, कला केंद्र चालक, मालक यांना अभय दिले जात असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे याची उच्च स्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.












