धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाला दमदार यश मिळाले असुन शिवसेनेने 55 पैकी 23 जागा लढत 15 जागावर विजय मिळवला आहे, शिवसेनेच्या विजयाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक 65 टक्के इतका राहिला आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला असुन शिवसेनेने आता अध्यक्षपदासह सत्तेवर दावा केला आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे नियोजन, बांधणी व तत्कालीन राजकीय स्तिथीतीत अनुरूप घेतलेल्या निर्णयामुळे शिवसेना सत्तेच्या दारापर्यंत पोहचू शकली आहे.
धाराशिव नगर परिषदेत शिवसेनेला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, रसद पुरवली मात्र काही यश आले नाही याची खंत पालकमंत्री सरनाईक यांनी अनेकदा बोलुन दाखवली. त्यानंतर तत्कालीन स्तिथी पाहता भाजप व मित्र पक्षाशी जिथे जमेल तिथे राजकीय जुळवून घेतले व काही ठिकाणी रसद पुरवली. 3 दिवसांचा दौरा करून पालकमंत्री सरनाईक यांनी सभा, बैठका घेतल्या त्यामुळे कळंब धाराशिव येथे काही जागा शिवसेनेला जिंकता आल्या. लोहारा येथे 4 पैकी 3 जागा मिळवल्या तर तुळजापूर धाराशिव कळंब येथे काही जागा मिळवल्या. भाजपसह इतर पक्षातील काहींना उमेदवारी देऊन विजय मिळवला व पक्षीय पातळीवर बेरजेचे राजकारण यशस्वी केले.
शिवसैनिक यांनी नाराजी, रोष व्यक्त केला तरी त्यांना शांत करून भुमिका, पक्षीय बलस्थाने, फायदे व तोटे समजावून सांगितले. आज जे उमेदवार निवडून आले आहेत ते पुर्वी कोणत्या पक्षात, कोणाचे समर्थक होते यापेक्षा ते शिवसेना व धनुष्यबाण या चिन्हावर निवडुन आले असुन त्यांना पक्षाची ध्येय, धोरणे व व्हीप लागु होतो. 15 पैकी 8 जागा ह्या सावंत समर्थक यांच्या आहेत तर 7 जागांची भर पडल्याने पक्षीय पातळीवर संघटनात्मक वजन वाढले आहे. आगामी सत्ता स्थापनेत त्यांची भुमिका महत्वाची राहणार आहे.











