धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर डॉ पाटील परिवाराकडून त्यांचे सांत्वन करीत आधार दिला गेला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील, मल्हार पाटील यांना या घटनेची माहिती कळताच ते तात्काळ बारामती येथे रवाना झाले व तिथे खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेत त्यांना कठीण समयी आधार दिला. सुनेत्रा पवार ह्या डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण असुन पवार हे तेरचे जावई आहेत.
पवार यांच्यावर उद्या 29 जानेवारी रोजी बारामती येथील शारदा प्रांगणात सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देश, राज्यभरातील नेते उपस्थितीत राहणार आहेत.
विमान अपघातापुर्वी अर्धा तास अधी त्यांच्याशी झालेला संवाद, अजूनही आवाज कानात घुमतो. त्यांच्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे, अशी पोस्ट केली आहे.
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणून नाही तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभं राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे, ही जाणीव अक्षरशः मन पोखरून टाकणारी आहे.
लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून नेहमीच शिकायला मिळालं. व्यक्तिगत नात्यातील मायेपलीकडे, ते माझ्यासाठी कायम एक आदर्श आणि प्रेरणास्थान राहिले.
मन अक्षरशः सुन्न आहे. अपघात होण्याच्या काही वेळ आधीच त्यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. नेहमीप्रमाणे आपुलकीने बोलणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली त्या क्षणी काय वाटलं, ते शब्दांत मांडणं खूप कठीण आहे.
क्षणार्धात आयुष्य कसं संपून जातं, याची ही भीषण जाणीव प्रचंड त्रासदायक आहे. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे, माझ्यासाठी ते कायम मार्गदर्शक आणि एक भक्कम आधार होते. त्या शेवटच्या संवादाची आठवण मनात प्रचंड भावनिक कोलाहल निर्माण करीत आहे, अजूनही विश्वास बसत नाही, अजितकाका सोडून गेले हे स्वीकार करणं अजूनही शक्य होत नाही.
या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. कृतिशील, अनुभवी, लोकहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वापासून वंचित झाल्याची जाणीव अधिक तीव्र होत आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांशी एकरूप होऊन काम करणारा नेता हरपल्याचं दुःख राज्याला दीर्घकाळ जाणवत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना असे म्हणत आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.












