धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या 140 कोटींच्या कामांना देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती नगर विकास विभागाने उठवली असुन याबाबत सुरु असलेला वाद मिटल्याने लाडका ठेकेदारासाठी काम करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. उद्यापासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून औपचारिक शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत नंतर केला जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक रितीने पार पडल्याचे स्पष्ट झाले ही स्थगिती उठवण्यात आली आहे.
59 पैकी काही रस्ते हे डीपी रोड नसताना या योजनेत घेण्यात आले तर काही रस्त्यांची करोडो रुपयांची कामे पुर्वी झालेली असताना देखील ती या योजनेत नव्याने घेण्यात आली असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केला होता याबाबत मात्र सोयीस्कर चुप्पी साधली जात असल्याने आगामी काळात हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
ही स्थगिती केवळ ‘गुत्तेदारी आणि टक्केवारी’साठीच आणली होती. “स्थगिती देणारे हेच सरकार होते आणि आता स्थगिती उठवणारेही हेच सरकार आहे. मग खापर मात्र विरोधकांच्या नावाने का फोडले जात आहे? तुमचा नगराध्यक्ष निवडून आल्यावरच बरोबर स्थगिती कशी उठते ? याचा अर्थ स्पष्ट आहे की, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि स्वतःचे आर्थिक हित साधण्यासाठी हे कारस्थान रचले गेले होते असा आरोप शिवसेना उबाठा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केला आहे.
नगर विकास विभागाने दिलेल्या स्थगिती आदेशाच्या विरोधात ठेकेदार अजमेरा यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर 23 मार्चला सुनावणी होणार होती मात्र त्यापूर्वीच नगर विकास विभागाने स्थगिती उठवल्याने कायदेशीर पेच प्रसंग टळणार आहे. याचिकेत पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्यावर आरोप करण्यात आले होते तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कायदेशीर अधिकार क्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांचे ‘लाडके ठेकेदार’ अशी ओळख निर्माण झालेल्या डी सी अजमेरा यांना काम मिळावे यासाठी राजकीय शक्ती व कायदेशीर युक्ती पणाला लावली होती त्याला अखेर यश आले आहे. कामाच्या गुणवत्ता व दर्जाची जबाबदारी आमदार पाटील यांनी खांद्यावर घेतली आहे.
धाराशिव शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 117 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील 59 रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार आहेत. निधी मंजूर झाला, आता कामे सुरू झाली तर
आपली अकार्यक्षमता जनतेसमोर येईल या भीतीने जिल्ह्यातील अपप्रवृत्तीच्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कामाला आडकाठी आण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेक हातखंडे वापरत हा विषय अनेक महिने प्रलंबित ठेवला असा आरोप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे.
धाराशिव नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यारंभ आदेश जारी केले होते. त्यानुसार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ देखील झाला. मात्र, पालकमंत्री यांच्याकडे काही नागरिक व जनप्रतिनिधींनी निवेदन सादर केले होते.या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सदर कामांना स्थगिती दिली.
तक्रारीतील मुद्द्यांची सत्यता तपासण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 4 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सचिवांच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेची सखोल तपासणी करण्यात आली असता, संपूर्ण प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक रितीने पार पडल्याचे स्पष्ट झाले.
अहवालानंतर देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली होती मात्र त्या कालावधीत जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे स्थगिती रद्द होऊनही कामाला सुरुवात करता आली नाही. आता आज स्थगित रद्द झाल्याचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेली नागरिकाची हेळसांड आणि गैरसोय आता दूर होणार आहे. रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आता कोणतीही आडकाठी येणार नाही. पालिका निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी भाजपाला भरभरून कौल दिल्यानंतर लगेच ही आनंदाची वार्ता आली आहे असे आमदार पाटील. यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हणटले आहे.











