डॉ पाटील निर्दोष, आरोप चुकीचे – माफीचा साक्षीदार विश्वासहार्य नाही, कोर्टात पुरावे मांडले
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने सुरु असलेला अंतीम युक्तिवाद अखेर 25 नोव्हेंबर रोजी संपला आहे. डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक यांनी सलग 24 सुनावणीत बाजु मांडली. डॉ पद्मसिंह पाटील हे या खुन खटल्यात कसे निर्दोष आहेत व त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत, माफीचा साक्षीदार हा विश्वासहर्य नाही असे म्हणत वकिलांनी त्याचे पुरावे, इतर खटल्यातील न्यायालयाचे निकाल मांडले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.
सतीश मंदाडे, मोहन शुक्ला व शशिकांत कुलकर्णी या 3 आरोपींच्या वतीने ऍड पारेख बाजु मांडत असुन ज्येष्ठ विधीज्ञ गिरीश कुलकर्णी हे 8 डिसेंबरला बाजु मांडणार आहेत. 27 जानेवारी 2026 पुर्वी निकाल द्यावा असे सुप्रीम कोर्टाने म्हण्टल्याने या प्रकरणाच्या सुनावणीला गती आली आहे. फिर्यादी व आरोपी या दोन्ही पक्षांनी सुनावणी वेळेत पुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे आदेशात म्हण्टले आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी होत आहे.
सरकार पक्षाच्या वतीने सीबीआय व तक्रारदार / याचिकाकर्ता आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने लेखी युक्तीवाद सादर केला आहे. सीबीआयच्या वतीने ऍड एजाज खान, आनंदीदेवी निंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड यांनी बाजु मांडली आहे.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री तथा तत्कालीन खासदार डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे. आरोपी पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार आहे, त्याने या हत्याकांडाचा उलघडा केला आहे.
पवनराजे निंबाळकर यांची 3 जुन 2006 रोजी हत्या झाल्यानंतर त्याचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीआयडी त्यानंतर सीबीआयने केला. आनंदीदेवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने हा तपास 23 ऑक्टोबर 2008 रोजी सीबीआयकडे वर्ग केला त्यानंतर सीबीआयने 7 महिन्यांनी पारसमल जैन याची मुलगी वर्षा हिच्या पत्रानंतर 25 मे 2009 रोजी गुन्ह्याची उकल केली. हत्याकांडनंतर तब्ब्ल 3 वर्षांनी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना आरोपी करीत अटक केली.
माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे दुहेरी हत्याकांडात आरोपी आहेत.
पवनराजे हत्याकांड तपासात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा व सुपारी दिल्याचा गुन्हा निष्पन्न झाला होता त्याचा स्वतंत्र गुन्हा लातुर पोलिसांत नोंद असुन न्यायप्रविष्ट आहे, अनेक वर्ष हे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे. 2009 साली हत्येची सुपारी व कट रचल्याचा गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे या 3 आरोपी विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही. यात पुढील सुनावणी 17 डिसेंबर 25 रोजी होणार असुन सतीश मंदाडे विरोधात अटक वॉरंट काढले आहे.












