मार्मिक – राजसत्ता दिशाहीन होते तेव्हा धर्मसत्तेचा हस्तक्षेप, भाजपने उमेदवारी दिली नाही
धाराशिव – समय सारथी
योग्य नगराध्यक्ष निवडा असे म्हणत मंहत इच्छागिरी महाराज यांनी तुळजापूरकरांना एक प्रकारे सुचक आदेश दिला आहे. व्यसन, अराजकता, गैरव्यवहार, भ्रष्टाचाराने तुळजापुर बदनाम झाले आहे त्यामुळे योग्य नगराध्यक्ष निवडा व आपले भवितव्य ठरवा. महंत योगी मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकट आरण्य महाराज यांनी एक एकत्रित निवेदन प्रसिद्ध करून भुमिका जाहीर केली आहे. राजसत्ता दिशाहीन होते तेव्हा धर्मसत्तेला त्यात हस्तक्षेप करावा लागतो असे म्हणत संदेश दिला आहे. भाजपकडुन अर्ज भरला होता मात्र उमेदवारी न दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
श्री क्षेत्र तुळजापूरचे नाव गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत सातत्याने आहे, परंतु त्या चर्चेचे कारण शक्तीपीठ, धार्मिक, शैक्षिणक, क्रीडा, कला किंवा आध्यात्मित नसून व्यसन, अराजकता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि अस्वच्छ राजकारण हे होते. श्री क्षेत्र तुळजापूरची ओळख शक्तीपीठ म्हणून आहे. तुळजापूर म्हणजे धर्म, परंपरा, मर्यादा व अध्यात्म ही आहे. पण गेल्या काही काळापासून तुळजापूरची ओळख एक दुर्दैवी आणि वाईट दिशेने वळवण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे.
जेव्हा समाजात अराजकता वाढते व राजसता ही दिशाहीन होते, तेव्हा धर्मसतेने राजसतेमध्ये हस्तक्षेप करून मार्गदर्शन करीत पुनर्स्थापना करणे आवश्यक असते. याच भावनेतून मी, महंत योगी मावजीनाथ महाराज आणि महंत व्यंकट अरण्य महाराज यांनी पवित्र भूमीच्या रक्षणासाठी तुळजापूर नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला असेही ते म्हणाले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक नागरिक मला भेटण्यास येऊ लागले. एक मोठा लोकाग्रह सुरु झाला. त्यांचे एकंदरीत मत होते. या पवित्र भूमीत पैशाचा जोरावर राजकारण होऊ नये. कारण जिथे अर्थकारणाच्या माध्यमातून सता आणि सत्तेतून माध्यमातून अर्थकारण सुरू होते, तिथे विकासाचे सर्व मार्ग बंद होतात. यामुळे आम्ही शहरातील सर्व मान्यवर, ज्येष्ठ तसेच प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा केली यात विशेषतः सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी ही सहभागी होते. त्याच वेळेस दोन्ही पक्ष बिनविरोध नगराध्यक्ष करण्याचे प्रस्ताव येऊ लागले.
तुळजापूर नगराध्यक्ष पद हे बिनविरोध व्हावे आणि शुद्ध मनाने प्रशासन चालावे या भावनेतून आम्ही सर्व पक्षांशी व सर्व उमेदवारांशी संवाद साधला. पण काही कारणांमुळे तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नावे एक उमेदवारी अर्ज आणि एक अपक्ष अर्ज असे दोन अर्ज भरले होते. परंतु भाजपाची उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाचा उमेदवारी अर्ज बाद झाला परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज हा कायम राहिला. अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता वेळेअभावी तो अर्ज मागे घेणे शक्य झाले नाही. मात्र हे मी स्पष्टपणे सांगतो मी या निवडणूक प्रक्रियेतील लढतीचा भाग नाही.
तरी तुळजापूरकरांना माझे जाहीर निवेदन आहे, की कृपया इतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापैकी योग्य व्यक्तीस आपण निवडावे व एक लक्षात ठेवावे आपण फक्त एक बटण दाबत नाही तर आपले पाच वर्षाचे भविष्य ठरवत आहोत. 100% मतदान करावे. सदरील सर्व प्रक्रियेमध्ये आपण तुळजापूर नगरीतील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व पक्षाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे धन्यवाद मानले आहेत.












