धाराशिव – समय सारथी
सांस्कृतिक महोत्सवात मंचावरील कलाकार यांनी मंदीर समितीचा अध्यक्ष या नात्याने मंचावर येण्याची आग्रहपुर्वक विनंती केली.सभागृहातील सर्व उपस्थितांना त्यांनी तुळजाभवानी देवीच्या स्तवनावर ठेका धरण्याची विनंती केली. आई तुळजाभवानी देवीच्या स्तवनामध्ये कोणीही तल्लीन होतो, जिल्हाधिकारी असलो तरीही मी एक भविक भक्त म्हणुन कलाकारांना प्रोत्साहन देणे हे माझे काम असुन ते मी पार पाडले, माझ्या या कृतीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील किंवा कोणाला वाईट वाटत असेल तर मी व्यक्तीश त्याची दिलगिरी व्यक्त करतो अश्या शब्दात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी वादावर पडदा टाकला आहे. दैनिक समय सारथी वृत्त पत्राने हा प्रकार समोर आणला होता त्यानंतर टिकेची झोड उठली होती, अखेर जिल्हाधिकारी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी यांचे संसार उघड्यावर आले असताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हे दोघे तुळजापुर नवरात्र सांस्कृतिक उत्सवात एका गाण्यावर नाचत ठेका धरताना दिसले, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून टीका होत होती त्यावर जिल्हाधिकारी यांनी खुलासा काढत पडदा टाकला आहे.
धाराशिव जिल्ह्यात एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणाऱ्या परिस्थितीत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार काम करत आहेत. एकीकडे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले असून हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत,तर दुसरीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवींजींचा शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू आहे.
या दुहेरी जबाबदाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मंदिर संस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतानाच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून बचाव व मदत कार्यातही आघाडी घेतली आहे असे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने म्हणटले आहे
“आई तुळजाभवानी देवीच्या कृपेनेच आम्ही ही जबाबदारी पार पाडत आहोत. जिल्ह्यातील जवळपास दोन हजार अधिकारी-कर्मचारी, NDRF, सेना व मंदिर प्रशासनातील कर्मचारी हे आपापल्या जबाबदाऱ्या सांघिक भावनेने पार पाडत आहेत. अनेक अधिकारी-कर्मचारी मागील चार-पाच दिवस घराकडे गेलेलेही नाहीत. 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेनंतर जिल्हाधिकारी पुजार हे तातडीने आपत्तीग्रस्त भागात पोहचले.ज्या दिवशी उपमुख्यमंत्री,पालकमंत्री,आपत्ती निवारण मंत्री तसेच आरोग्यमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले असता जिल्हाधिकारी हे प्रत्यक्ष सोबत राहून पाहणी दरम्यान करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत होते.
मात्र,महोत्सवातील परंपरा व जबाबदारी लक्षात घेऊन ते अल्प वेळासाठी मंचावर गेले असता कलाकारांनी आग्रहाने त्यांना उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी बोलावले.“त्या क्षणी जिल्हाधिकारी म्हणूनच नव्हे,तर एक भाविक भक्त म्हणून देवीच्या स्तवनात सहभागी झाले.जर या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगीरी व्यक्त करतो,” असे जिल्हाधिकारी पुजार यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील या आगळ्या-वेगळ्या परिस्थितीत प्रशासनाचे सांघिक काम आणि जिल्हाधिकार्यांची समतोल भूमिका दिसून येत आहे.