धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने 2 सप्टेंबर रोजी मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात अंतिम लेखी युक्तिवाद सादर केला जाणार आहे. सीबीआयने सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद सादर केल्यानंतर राजेनिंबाळकर यांच्यावतीने ऍड पी एम गवाड युक्तिवाद सादर करतील.
उस्मानाबाद जिल्हा बँक, होम ट्रेड, तेरणा ट्रस्ट सभासद मालकी, तेरणा साखर कारखाना, 2002 मधील साखर निर्यात घोटाळा, कारगिल निधीसह अन्य घोटाळे, 2004 च्या विधानसभा निवडणुकीत 484 मतांनी अपक्ष उमेदवार पवनराजे यांचा झालेला पराभव, साखर घोटाळा यासह अन्य मुद्यामुळे डॉ पाटील व पवनराजे यांच्या टोकाचे वितुष्ट निर्माण झाले होते. यातील कोणते मुद्दे व पुरावे निंबाळकर परिवाराकडुन कोर्टात मांडले जातात हे पाहावे लागले.
पवनराजे यांचे पुत्र शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व डॉ जय राजे निंबाळकर हे कायदेशीर न्यायासाठी गेली 19 वर्षापासुन पाठपुरावा करीत आहेत. हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावे असे पत्र मुंबई उच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान मुंबई ट्रायल कोर्टाला दिले आहे, त्यामुळे हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे.
पवनराजे व डॉ पाटील हे नात्याने चुलत भाऊ आहेत. कै पवनराजे हत्याकांड नंतर त्यांचे पुत्र खासदार ओमराजे हे राजकारणात आले तर डॉ पाटील यांना अटक झाल्यावर ते सक्रीय राजकारणापासून अलिप्त झाले, त्यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे राजकारणात आले. डॉ पाटील. परिवाराने शरद पवार व राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप प्रवेश केला. ओमराजे व राणाजगजीतसिंह हा सत्तासंघर्ष गेली 2 दशके लोकसभा, विधानसभा व इतर निवडणुकीत पाहायला मिळत आहे. कोणताही सामाजिक व राजकीय मुद्दा, विषय, विकास, वाद शेवटी इथेच येऊन थांबतो. ज्या सत्तेसाठी पवनराजे यांचा खुन केला तो सत्तेचा हेतु साध्य होऊ देणार नाही असे ओमराजे सांगतात तर आमचा यात काहीही संबंध नाही अशी भुमिका पाटील कुटुंब घेतात.

पवनराजे निंबाळकर यांची 3 जुन 2006 रोजी हत्या झाल्यानंतर त्याचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीआयडीने केला मात्र कोणतेही धागेदोरे हाती न लागल्याने हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी याचिका आनंदीदेवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने हा तपास 23 ऑक्टोबर 2008 रोजी सीबीआयकडे वर्ग केला त्यानंतर सीबीआयने 7 महिन्यांनी पारसमल जैन याची मुलगी वर्षा हिच्या पत्रानंतर 25 मे 2009 रोजी गुन्ह्याची उकल केली. हत्याकांडनंतर तब्ब्ल 3 वर्षांनी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना आरोपी करीत अटक केली.
सीबीआयने त्यांचा अंतिम युक्तिवाद सादर करीत लेखी म्हणणे सादर केले. सीबीआयने केलेल्या तपासाच्या अनुषंगाने 20 मुद्दे उपस्थितीत केले असुन प्रत्येक मुद्दा व त्या मुद्याला पुरक असलेले पुरावे, कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. माफिचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैन यांचा कोर्टातील कबुली जबाब व शूटर दिनेश तिवारी याने कोर्टात दिलेल्या 164 च्या जबाब व इतर परिस्थितीजन्य, तांत्रिक पुराव्यावर सीबीआयने भर दिला आहे, त्यामुळे राजेनिंबाळकर कोणते मुद्दे मांडतात याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय कारकीर्द व अस्तित्व धोका बनलेल्या कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा 2005 मध्ये माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचला व 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केली असा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ठेवला आहे. माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना यात मुख्य आरोपी केले असुन पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे संशयीत आरोपी आहेत, हे सर्व आरोपी जामीनावर आहेत.
दुहेरी खुन खटल्याची 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन सुनावणी सुरु आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावतीने ऍड भुषण महाडिक हे बाजू मांडत आहेत तर इतर 8 आरोपींच्या वतीने ऍड नेहा सुळे ह्या बाजु मांडत आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष यात झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने 2013 मध्ये हा खटला अलीबागवरून मुंबई सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.