धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात आरोपी विनोद गंगणे यांच्या सुनावणी दरम्यान जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी अनेक धक्कादायक दावे केले. ड्रग्ज तस्करीत विनोद गंगणे हे तुळजापूर येथील सुत्रधार असुन त्यांनी अनेक जणांशी ड्रग्जचे व्यवहार केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली.
ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात नाव निष्पन्न झाल्यावर गंगणे यांनी त्यांचे 2 मोबाईल फोन हे गहाळ झाल्याची तक्रार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पोलिस ठाण्यात दिली, या मोबाईल फोनमध्ये महत्वाचे पुरावे असुन ते मोबाईल कुठे आहेत? गंगणे यांनी त्याची कुठे विल्हेवाट लावली व पुरावे नष्ट केले. हे मोबाईल जप्त करणे व तपास करणे आहे यासाठी जामीन देऊ नये अशी विनंती ऍड देशमुख यांनी कोर्टात केली. गहाळ तक्रारची प्रत त्यांनी कोर्टात सादर केली.
पोलिसांनी राहुल कदम परमेश्वर या आरोपीला अटक केल्यानंतर 25 मार्च रोजी कोर्टात रिमांड दाखल केले त्यात तपासात विनोद गंगणे यांचे नाव निष्पन्न झाले. त्यांना आरोपी क्रमांक 20 म्हणुन पाहिजे आरोपीत नाव समाविष्ट केले. गुन्ह्यात नाव येताच गंगणे हे फरार झाले व त्यांनी 28 मार्चला मोहोळ पोलिस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार नोंद केली.
पुरावे नष्ट करण्यासाठी गंगणे यांनी हे कृत्य केले असुन यात त्यांनी क्रिमिनल माईंड (गुन्हेगारी मानसिकता) लागु केले, गंगणे यांनी दुसऱ्याच्या नावाने ड्रग्ज खरेदी केली त्यानंतर मोबाईल गहाळ हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये ड्रग्ज अनुषंगाने अनेक पुरावे असु शकतात त्यामुळे तो जप्त करायला हवा असा युक्तिवाद ऍड देशमुख यांनी केला. गुन्हा नोंद झाला की मोबाईल लगेच गहाळ होतो कसा असे ते म्हणाले.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.