धाराशिव – समय सारथी
तुळजापूर यात्रा मैदान जागा हडप प्रकरणी गठीत चौकशी समितीचा अंतीम अहवाल दिरंगाईमुळे अद्याप आलेला नाही, या प्रकरणात अहवाल कधी येणार याकडे लक्ष लागले असुन अहवालानंतर कार्यवाहीची दिशा ठरणार आहे.
तुळजापूर नगर परिषदेने यात्रा मैदानासाठी सर्वे नंबर 138 मधील 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन संपादीत केली मात्र ती जागा हडप केल्याची व विक्रीची तक्रार संभाजी शिवाजीराव नेप्ते व किरण माणिकराव यादव यांनी केली होती, त्यानंतर त्याची तहसीलदार अरविंद बोळंगे अध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार सचिव व सदस्य मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी अशोक भातभागे यांनी चौकशी अहवाल दिला.
चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. या समितीत उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी ओंकार देशमुख सचिव, उपाध्यक्ष उपजिल्हाधिकारी निवडणुक शिरीष यादव, सदस्य म्हणुन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख, जिल्हा सहनिंबधक, सहाय्यक नगर रचनाकार व उपायुक्त नगर परिषद प्रशासन त्रिंबक डेंगळे पाटील हे सदस्य आहेत.
उपविभागीय अधिकारी,भुमी अभिलेख, नगररचना, नगर पालिका प्रशासन अधिकारी, जिल्हा निबंधक यांसह अन्य विभागाच्या अधिकारी यांना समितीने कार्यवाही करून त्यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्यास सांगितले होत्र त्यापैकी काही जणांनी अहवाल दिला आहे तर काही जणांचा बाकी आहे. त्यामुळे अंतीम अहवाल राखडला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बनावट रेखाकन नकाशे, अकृषी व बांधकाम परवाने, खरेदी विक्री खत करणारे तत्कालीन नगर परिषद, भुमी अभिलेख, मुद्रांक विभागातील अधिकारी, काही बाबींना मंजुरी दिलेले नगर परिषदेतील तत्कालीन काही पुढारी व अधिकारी कारवाईच्या रडारवर आहेत. बोगस लेआऊट दस्तासह काही बाबी फौजदारी कारवाईशी तर काही दिवाणी स्वरूपाच्या आहेत.
माजी उपनगराध्यक्ष पंडीत जगदाळे, हरिश्चंद्र जगदाळे, गंगाधर चव्हाण यांच्यासह 27 जणांवर बनावट दस्ताऐवज, खोटे निवेदन व शपथपत्र, शासनाचे आर्थिक नुकसान, दिशाभुल व फसवणुक केल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. यात्रा मैदान जागा हडप करून त्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम, पत्र्याचे गाळे अर्थात अतिक्रमण काढून टाकून जागा पुनःश्च शासनाच्या ताब्यात घेणे, 27 जणांकडुन शासनाच्या नुकसान भरपाईपोटी 39 कोटी वसुल करणे, सदर वसुलीसाठी त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून बँक खाती गोठवणे, या जागेच्या बाबतीत केलेली सर्व खरेदी खत रद्द करणे अशी मागणी तक्रारदार नेप्ते व यादव यांनी केली आहे.
तुळजापूर यात्रा मैदान घोटाळ्यात गुन्हा नोंद करण्याची मागणी होत असुन या प्रकरणात विधिमंडळ अधिवेशनात आमदारांनी आवाज उठविणे गरजेचे आहे.












