धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात रणजीत पाटील व शुभम नेप्ते या 2 आरोपीना जामीन मंजुर करण्यात आली आहे. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी हा जामीन मंजुर केला आहे. आरोपीच्या वतीने ऍड अंगद पवार व ऍड युवराज खैरे यांनी बाजु मांडली. पोलिसांच्या दोषारोप पत्रानुसार रणजित पाटील हे तस्कर गटातील आरोपी असुन त्यांना 1 मे रोजी अटक करण्यात आली होती, ते धाराशिव येथील जेलमध्ये होते, त्यांना 3 महिन्यानी जामीन मिळाला आहे तर शुभम नेप्ते याला 29 मे रोजी अटक केली होती.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन अलोक शिंदे,उदय शेटे,विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेप्ते या 5 आरोपीना जामीन मिळाला आहे. 11 आरोपी फरार असुन 20 आरोपी धाराशिव येथील कारागृहात आहेत तर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे व स्वराज उर्फ पिनू तेलंग हे 2 आरोपी पोलीस कोठडीत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडत आहेत.
38 पैकी 11 आरोपी फरार असुन त्यांना अटक करणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सर्व फरार आरोपीना 15 ऑगस्टपर्यंत अटक करुन जामीनावर असलेल्या आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी असे आदेश दिल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
6 आरोपींचे जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी स्तरावर प्रलंबित आहे. माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर 2 ऑगस्ट, नानासाहेब खुराडे 11 ऑगस्ट, दुर्गेश पवार 2 ऑगस्ट, राजू उर्फ पिट्टा सुर्वे 4 ऑगस्ट व शामकुमार भोसले 8 ऑगस्ट रोजी तर नियमित सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
फरार आरोपीत मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, अभिजीत गव्हाड, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे यांचा समावेश आहे. पोलिसांनी 38 आरोपींचे सेवन व तस्कर असे 2 गट केले असुन 28 आरोपी तस्कर तर 10 आरोपी सेवन गटात आहेत.