धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी डीपीसीच्या निधी स्थगितीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. वास्तव परिस्थितीची माहिती नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘बाप’ असे संबोधून डीपीसीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा अवमान केला, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्यांना आई तुळजाभवानी सद्बुद्धी देवो असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी लगावला आहे.
मंत्री राणे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यामुळे महायुतीचा घटक म्हणून जिल्ह्यासाठी विकास निधी मिळेल अथवा काही मोठी घोषणा करतील असे वाटले होते. मात्र डीपीसीच्या निधीबाबत बोलताना त्यांनी एकप्रकारे जनतेचा अवमान केला आहे. वास्तविक डीपीसीचा निधी हा जनतेच्या विकासासाठी असताना भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी देऊन स्थगिती आणली.
त्यानंतर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले. डीपीसीचा हा निधी मार्च 2024 पूर्वी खर्च होऊन विकासकामे अपेक्षित होती. परंतु भाजप आमदार आणि मंत्र्यांच्या अशा वक्तव्य आणि छुप्या कारवायांमुळे विकासकामे मार्गी लागण्यास अडथळा निर्माण होत आहे. म्हणून आता मंत्री राणे यांना सद्बुद्धी मिळो हीच मागणी आम्ही आई तुळजाभवानी देवीच्या चरणी प्रार्थना करत आहोत, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी म्हटले आहे.