धाराशिव – समय सारथी
शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत विरोध करायला सुरुवात केली आहे. धाराशिव तालुक्यातील नितळी येथील शेतकऱ्यांनी सीमांकनासाठी आलेले पथकाला विरोध करीत हकलून दिले. शेतकरी बांधवांनी तीव्र विरोध केल्याने पथकाला रिकाम्या हाताने परत जावे लागले.शक्तिपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही असे ठणकावून सांगितले व कायमस्वरूपी शक्तीपीठ महामार्गला आमचा विरोध राहिल, आम्ही कोणत्याही प्रकारे जमिनी देणार नाहीत अशी भुमिका शेतकऱ्यांनी मांडली. नामदेव तुकाराम जगताप, लहू शिवाजी जगताप, किसन काकडे,नामदेव किसन रंधवे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने होते.
शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार आहेत. या जमिनींवर त्यांची उपजीविका अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामध्ये धाराशिव जिल्ह्यासह 12 जिल्हे समाविष्ट आहेत, यात वर्धा,यवतमाळ,हिंगोली,नांदेड,परभणी,बीड,लातूर,सोलापूर, सांगली,कोल्हापूर व सिंधुदुर्ग आहेत. हा महामार्ग महाराष्ट्रातील तीन प्रमुख शक्तीपीठांना जोडणार आहे: कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी. तसेच, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग मंदिरांनाही हा महामार्ग जोडेल. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, आणि सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर या तीर्थक्षेत्रांनाही हा महामार्ग जोडणार आहे.