धाराशिव – समय सारथी
शक्तीपीठ मार्गाला विरोध करणाऱ्या 6 शेतकऱ्यांना धाराशिव पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्यांना तामलवाडी पोलीस ठाण्यात नेहण्यात येत आहे. महामार्ग मोजणी करायला अधिकारी पोलीस बंदोबस्त सह आले होते यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. खुंटेवाडी येथे कोणतीही नोटीस न देता अधिकारी मोजणी व सीमांकन करण्यासाठी आले होते याचा जाब विचारल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अश्या घोषणा यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्या.
शेतकरी शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करत आहेत कारण या प्रकल्पामुळे त्यांना त्यांच्या शेतीची जमीन गमावावी लागेल आणि त्यासाठी पुरेशी नुकसान भरपाई मिळत नसल्याची त्यांची मुख्य तक्रार आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार आहेत. या जमिनींवर त्यांची उपजीविका अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामध्ये धाराशिव जिल्ह्यासह 12 जिल्हे समाविष्ट आहेत, यात वर्धा,यवतमाळ,हिंगोली,नांदेड,परभणी,बीड,लातूर,सोलापूर, सांगली,कोल्हापूर व सिंधुदुर्ग आहेत. हा महामार्ग महाराष्ट्रातील तीन प्रमुख शक्तीपीठांना जोडणार आहे.
कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी. तसेच, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंग मंदिरांनाही हा महामार्ग जोडेल. पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, आणि सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर या तीर्थक्षेत्रांनाही हा महामार्ग जोडणार आहे.