धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन मंजुर करण्यात आला आहे. हत्याकांडानंतर दिनेश तिवारी याला 25 मे 2009 तर पिंटू सिंग याला 15 जुन 2009 रोजी अटक करण्यात आली होती, तेव्हापासून हे दोन्ही संशयित आरोपी जेलमध्ये होते.
दरम्यान डॉ पद्मसिंह यांच्या वतीने 3 साक्षीदार तपासण्यास कोर्टाने परवानगी दिली होती मात्र त्यांना समन्स न मिळाल्याने पुन्हा समन्स काढण्यात आले असुन ते बजावण्याचे आदेश मुंबई क्राईम ब्रांचला दिले आहेत, पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुनावणीची प्रक्रिया निकालाच्या अंतीम टप्प्यात असताना 2 जणांना जामीन मिळाला आहे.
शुटर महात्मा चौधरी उर्फ पिंटू सिंग व दिनेश तिवारी या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. खटल्याचा निकाल लागेपर्यंत पिंटू सिंग याला दर शनिवारी 11 ते 1 तर दिनेश तिवारी याला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी 11 ते 2 या वेळेत हजेरी लावली आहे. मुख्य आरोपी डॉ पद्मसिंह पाटील यांना कोर्टाने जामीन मंजुर केला आहे, त्यांना 3 साक्षीदार तपासण्यास परवानगी दिली आहे. आरोपींचे 313 चा जबाब झाला आहे, आरोपी हे गेली 16 वर्षांपासून दीर्घकाळ जेलमध्ये आहेत यासह अन्य बाजु कोर्टात मांडण्यात आल्या. दुहेरी खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन सुनावणी सुरु आहे. सर्व आरोपी जामीनावर आहेत.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांच्या याचिकेनंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना मुख्य आरोपी करीत राजकीय द्वेषातुन हत्या झाल्याचा ठपका ठेवत 9 जणांच्या विरोधात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली.
दुहेरी हत्याकांडात आरोपी पारसमल बादला उर्फ जैन हा माफिचा साक्षीदार बनला आहे त्याला सुरुवातीला 25 मे 2009 रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचं दिवशी 25 मेला शुटर दिनेश तिवारी, 30 मे ला मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, 31 मे ला लातुर येथील सतीश मंदाडेला अटक झाली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना मुंबईतुन अटक केली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. 15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
2004 साली कै पवनराजे निंबाळकर यांनी डॉ पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक अपक्ष उमेदवारी लढवली होती, त्यात डॉ पाटील हे अवघ्या 484 मतांनी विजयी झाले आणि राजकीय वितुष्ट टोकाला गेले. विधानसभा निकालानंतर तेरणा ट्रस्ट व तेरणा साखर घोटाळा आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते, पवनराजे यांनी तेरणा ट्रस्ट सभासदांच्या मालकी बाबत धाराशिव कोर्टात प्रकरण दाखल केले. 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली, त्यांच्या हत्यानंतर 13 व्या दिवशी तक्रारदार हयात नसल्याचे कारण देत हे प्रकरण कोर्टात बंद करण्यात आले, हे विशेष.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची पवनराजे हत्याकांडात साक्ष झाली आहे. अण्णा हजारे हत्येचा कट व 30 लाखांची सुपारी प्रकरण याच गुन्ह्यात उघड झाले, लातूर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यात डॉ पद्मसिंह पाटील, मोहन शुक्ला व सतीश मंदाडे हे 3 जण संशयित आरोपी आहेत. लातुर कोर्टात पुढील सुनावणी 12 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहेत. यात आरोपी सतीश मंदाडे हे हजर राहत नसल्याने लातुर कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे, मात्र पोलिसांना पण ते सापडेना झाले आहेत. मंदाडे हे मुंबई येथे सुनावणीस अधुनमधुन हजर असतात हे विशेष.