धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट लिहून हल्लाबोल केला आहे. युद्धात जिंकता येत नाही तेव्हा कटकारस्थान रचले जाते, काहींना पोटदुखी, आसुरी आनंद मिळत असुन ड्रग्ज प्रकरणाचा पाठपुरावा करणार व दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार असा प्रण त्यांनी व्यक्त केला आहे. खासदार ओमराजे यांची पोस्ट चांगलीच चर्चेत आली असुन त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव न घेता मार्मिक शब्दात टीका केली आहे. काल आमदार राणा यांनी ओमराजे यांच्यावर टीका केली होती त्याला खासदार ओमराजे यांनी उत्तर दिले आहे.
सार्वजनिक आयुष्यात असताना मी एकच नियम पाळला कायम जनतेला सहज उपलब्ध असेन आणि शक्य तसे त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा. हे करताना माझे आणि लोकांचे असे नाते जुळून आले की मला त्यांच्या मनातून कोणीही काढू शकत नाही. निवडणुकीत विरोधक वारेमाप पैशाचे वाटप करून ही जिंकू शकत नाही हे त्यांनी सारखे अनुभवले. मला लोकांनी दिलेले 3 लाख 30 हजार चे मताधिक्य हेच यांच्या पोटदुखीचे मुख्य कारण आहे असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.
जेव्हा तुम्ही युद्धात जिंकू शकत नाही तेव्हा कारस्थान करून निदान प्रतिमा तरी मलिन करू असा आसुरी आनंद घेण्याचे काहींचे मनसुबे आहेत.त्याच नियोजनाचा भाग म्हणून खोट बोल पण रेटून बोल या नीतीने विरोधक मला टार्गेट करत असताना मी काय आहे हे जनता जाणून आहे. ज्या ड्रग्स बद्दल मी सगळ्यात पहिले संसदेत आवाज उठवला, प्रेस घेऊन सत्य समोर आलेच पाहिजे. त्या प्रकरणात मुद्दाम सातत्याने आरोप करून विरोधक राजकीय पोळी भाजत आहेत असे ते म्हणाले.
मी राजकारणात पैसे कमावण्यासाठी असतो तर आत्तापर्यंत गद्दारी करून शेकडो कोटीची माया सहज जमवली असती. पण मला राजकारणासाठी आणि निवडून येण्यासाठी पैश्याची गरज नाही. आता या सर्व प्रकरणाचा मीच पाठपुरावा करणार आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार असा प्रण त्यांनी केला आहे. लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही जे प्रेम कायम दाखवत आहात ते असेच ठेवा बाकी खोट्या लोकांना हा ओम राजे पुरून उरतो असे आवाहनही त्यांनी केले आहे.