‘मित्रा’चा दर्जा व वाद – संधीसाधु, स्वार्थासाठी पक्षांतर, मंत्रीपदाची हाव, मॉनिटरची पात्रता नसताना मंत्री
धाराशिव – समय सारथी
दोन हाणा पण मंत्री म्हणा अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर केली आहे. आमदार राणाजगजीतसिंह यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘मित्रा’ या संस्थेचे उपाध्यक्ष करण्यात आले असुन त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा नसतानाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्यमंत्री दर्जा असे टाकण्यात आले त्यावरून ओमराजे यांनी टीका केली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे संधीसाधु असुन त्यांनी स्वार्थासाठी पक्षांतर केले, भाजपची सत्ता गेली की ते सत्तेसाठी ज्या पक्षाची सत्ता आहे त्या दुसऱ्या पक्षात जायला तयार आहेत, त्यांना मंत्रीपदाची हाव लागली असल्याची टीका केली.
वर्गात मॉनिटर होण्याची सुद्धा पात्रता नव्हती तरी शरद पवारांनी राणाजगजीतसिंह पाटील यांना मंत्रीपद दिले. राज्यमंत्रीपदाचा अधिकृत दर्जा नसतानाही, शासकीय बैठकीत त्यांच्या नावासमोर ‘राज्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात येत आहे इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील त्यांच्या दररोजच्या दौऱ्यांना देखील मंत्र्यांसारखी शासकीय प्रसिद्धी दिली जात आहे. पाटील यांच्या सहाय्यकांकडून प्रशासनाकडे वाहन, विविध सरकारी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला जात आहे.
ओमराजे टीका करताना म्हणाले की, ही माणसं केवळ सत्तेसाठी, केवळ मंत्री व्हायचं आहे म्हणूनच पक्षांतर करतात. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी राणा पाटील यांना चांगलंच ओळखलं आहे. त्यांनी जे केलं, ते योग्यच केलं आहे. ही पदं काही आजरामर नसुन आयुष्यभर टिकणारी नाहीत,आज आहेत, उद्या नसतील. पद घेऊन मिरवायचे नसते, लोकांच्या कामाला पडायचे असते. तरीसुद्धा जी हाव आहे, ती यातून दिसते. एक स्थानिक म्हणं आहे दोन हाणा पण मला मंत्री म्हणा” अशी पद्धतच सध्या सुरू आहे. शेवटी, हा प्रत्येकाच्या प्रवृत्तीचा भाग असतो असे ओमराजे म्हणाले.