धाराशिव – समय सारथी
पिकाचे पैसे हातात आल्यावर आपल्याकडे लग्नकार्य थाटात साजरे केले जाते. मात्र यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचा चिखल झाला आहे. दुर्दैवाने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या आपत्तीग्रस्त कुटुंबात लग्न कार्य ठरलेले आहे ते कुटुंब मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. लग्नकार्य पुढे ढकलण्याचा अनेकजण विचार करीत आहेत तर काहीजण खाजगी सावकारावर विसंबून आहेत. अशा संकटाच्या काळात बाधित शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत तहसीलदार यांच्याकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
धाराशिव शहरातील प्रतिष्ठान भवन येथे सोमवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. फेब्रुवारी महिन्यात 6 आणि 7 तारीख विवाह सोहळ्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. आपल्या बहुतांश सहकाऱ्यांसह आपण स्वतः व्यक्तिगत पातळीवर या महत्वाच्या प्रक्रियेत तन- मन – धनाने सहभागी होणार आहेतच. त्याव्यतिरिक्त तेरणा ट्रस्ट, तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि राज्यातील इतर सामाजिक संस्थांचाही सहभाग असणार आहे. जिल्हा प्रशासनही यात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. पुढील काळात राज्यातील ज्या जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अधिक फटका बसला आहे त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने पुढाकार घेत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करावेत असे आपले प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे ओढवलेल्या पार्श्वभूमीवर खूप समस्या उद्भवल्या आहेत. अनेकांनी आपल्याकडे गांभीर्याने लग्न कार्याच्या अनुषंगाने निर्माण झालेले पेच मांडले आहेत. त्यामुळे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी यात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गरजूंनी त्यांच्या तालुक्यातील तहसीलदारांकडे 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून घ्यावी. तसेच इतरांनी जमेल त्या प्रकारे या सामाजिक कामासाठी उत्स्फूर्तपणे योगदान द्यावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. यावेळी
वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करावा
दोन दिवसांनी 30 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण मुंबईत आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांसोबत असणार आहोत. त्यामुळे प्रेमाच्या भावनेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपण धाराशिव येथे नसल्याची नोंद घ्यावी. आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केल्यास आपल्याला त्याचा सर्वाधिक आनंद होईल. अतिवृष्टी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना, बाधित आणि अडचणीत सापडलेल्या माता भगिनींना दिलासा देऊन समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात यावा असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.












