निवडणूक शपथपत्र व इतर पत्रावरील सह्या वेगळ्या – ‘ते’ पत्रच जिल्हाधिकारी यांना मिळाले नाही
धाराशिव – समय सारथी
उमरगा – लोहारा मतदार संघांचे आमदार प्रवीण स्वामी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या हक्कभंग प्रस्ताव इशारा पत्र प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. आमदार स्वामी हे चुक कबूल करणार की जर ते पत्र खोटे असेल तर कारवाई करण्यासाठी गुन्हा नोंद करणार हे पहावे लागेल. जिल्हाधिकाऱ्यावर हक्कभंग प्रस्ताव सारख्या गंभीर विषयावर 2 पत्र समोर आली असुन स्वामी यांनी मौन बाळगल्याने गुपित वाढले आहे.
स्वामी यांनी 2024 ची विधानसभा निवडणुक लढवताना जे शपथपत्र दाखल केले त्यात सही वेगळी, पहिले व दुसरे पत्र समोर आले त्यातील सही वेगळी.. एकंदरीत अनेक सह्या असल्याने सर्व गुंता वाढला आहे. सही प्रकरणात स्वामी हे चांगलेच चर्चेत व गोत्यात आले आहेत. दरम्यान राजशिष्टाचार भंग प्रकरणात स्वामी यांनी जी तक्रार केली आहे ती जिल्हाधिकारी यांना मिळाली नसल्याची माहिती आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचे वितरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार स्वामी यांना बोलावण्यात आले नाही, त्यावरून वाद सुरु झाला. राजशिष्टाचार भंग प्रकरणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर 7 दिवसाच्या आत निलंबनाची कारवाई करावी अन्यथा त्या कार्यक्रमाला आपली मूक संमती होती असे मानून जिल्हाधिकारी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल असा इशारा स्वामी यांनी दिला.
स्वामी यांच्या पहिल्या पत्रात लोकसभेत हक्कभंग आणू असा उल्लेख आहे. स्वामी हे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार मग ते लोकसभेत हक्कभंग कसा आणणार ? राजशिष्टाचारनुसार मला व आमदार प्रवीण स्वामी यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता खासगी ठिकाणी मदत वाटप करण्यात आले असे त्या पत्रात नमुद आहे. स्वामी यांची 2 वेगवेगळी पत्र समोर आली असुन त्यात सही वेगळी आहे तर मजकूर सारखाच आहे.
आमदार स्वामी यांनी हे पहिले पत्र उमरगा येथील काही पत्रकार यांना पाठवले मात्र ते पत्र वाचल्यावर काहींनी स्वामींना फोन करून चुक लक्षात आणुन दिली त्यानंतर ते त्यांनी डिलीट केले मात्र तोपर्यंत ते पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते असे तिथल्या पत्रकार यांचे म्हणणे आहे. आमदार स्वामी हे नामधारी, सही पुरते नाममात्र अश्या विविध टिकेला तोवर सुरुवात झाली होती.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याच विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना जे पत्र दिले आहे त्यातील व आमदार प्रवीण स्वामी यांनी दिलेल्या पत्रातील मजकूर सारखाच आहे, हा योगायोग आहे का ? आमदार स्वामी यांच सुरुवातीला जे पत्र व्हायरल झाले त्यावरील व नंतर दिलेल्या दुसऱ्या पत्रावरील स्वामी यांची सही ही वेगवेगळी आहे, त्यातील फरक स्पष्ट दिसतो. आमदार स्वामीचे पत्र परस्पर कोण टाईप केले, त्यावर खोटी सही कोण केली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आमदार स्वामी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही, त्याची सोशल मीडियावरही चुप्पी आहे.
आमदार स्वामी समर्थक हे पत्र ‘कांड’ असुन हा खोडसाळपणा असल्याचे सांगत आहेत, विरोधकांनी ठरवून केलेला हा प्रकार आहे असे ते म्हणत आहेत. स्वामी जर खरेच यात नसतील तर त्यांनी स्वतःचे निर्दोषत्व व ‘आमदार’ या संविधानिक पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी पुढे येऊन ठोस भुमिका घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाची चौकशी विधीमंडळ समितीकडुन किंवा पोलिसांकडुन करण्याची मागणी व तक्रार स्वामी करणार का ? हे पाहावे लागेल.
हा विषय फक्त स्वामी या एका व्यक्ती पुरता मर्यादित किंवा एका आमदार यांचा नसुन हा विधीमंडळ प्रतिष्ठा व नियमांचा आहे. कोरे लेटर पॅड, त्यावर सही असे राजकारणात होत राहते त्यात नवीन काय ? असे म्हणणारे ‘महाभाग’ सुद्धा आहेत मात्र हा विषय ‘राजशिष्टाचार’ व थेट आयएएस दर्जाच्या अधिकारीवरील ‘हक्कभंग’ सारख्या गंभीर विषयातील आहे, त्यामुळे यातील ‘सत्य’ समोर आले पाहिजे.
स्वामी यांचे 2024 विधानसभा निवडणुक शपथपत्र व इतर ठिकाणी सही वेगळी आहे, त्यामुळे अधिक खुलासा तेच स्पष्टपणे करू शकतात. राजकारणात ‘दल’ बदलू सारखे स्वामींचे सही ‘बदलू’ असे होऊ नये म्हणजे झाले. आधीच त्यांच्यावर ‘लेट लतीफ’ ‘टेकू आमदार’ अशी टीका होत आहे.