धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडात सरकार पक्ष व आरोपी पक्षाच्या वतीने सर्व साक्षी पुरावे संपले आहेत. डॉ पद्मसिंह यांच्या वतीने दिलीप रूपवते,मिलिंद गायकवाड व अनिल वडवणे हे 3 साक्षीदार तपासण्यास कोर्टाने परवानगी दिली होती त्यानुसार त्यांच्या साक्षी 18 ऑगस्ट रोजी नोंदविण्यात आल्या. अंतिम युक्तिवाद 25 ऑगस्ट रोजी मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात होणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात आरोपीच्या वतीने अंतिम युक्तिवाद झाला होता मात्र डॉ पाटील यांनी 3 साक्षीदार तपासण्याची विनंती केली त्यानुसार ती देण्यात आल्याने प्रकरण लांबले.
हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दुहेरी खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन सुनावणी सुरु आहे. मुख्य आरोपी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपी जामीनावर आहेत. देशभर गजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी इंडिका गाडी पनवेलच्या बेलवली जवळ सोडून दिली. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही.
पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांच्या याचिकेनंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना मुख्य आरोपी करीत राजकीय द्वेषातुन हत्या झाल्याचा ठपका ठेवत 9 जणांच्या विरोधात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली.
मुंबई क्राईम ब्रांचचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांच्या टीमला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की जैनने मोठे काम केले आहे. 25 फेब्रुवारी 2009 ला एकेकाळी सोने व्यापारी व अनेक दरोड्याचे गुन्हे नोंद असलेल्या जैनला अटक करण्यात आली, त्याने कबुली दिली. याच तपासात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट व सुपारी 30 लाखात दिल्याचे उघड झाले. राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रवक्ते प्रफुल्ल पटेल व डी पी त्रिपाठी यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी 10 जुन 2009 रोजी डॉ पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली.
दुहेरी हत्याकांडात आरोपी पारसमल बादला उर्फ जैन हा माफिचा साक्षीदार बनला आहे त्याला सुरुवातीला 25 मे 2009 रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचं दिवशी 25 मेला शुटर दिनेश तिवारी, 30 मे ला मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, 31 मे ला लातुर येथील सतीश मंदाडेला अटक झाली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना मुंबईतुन अटक केली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली. शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन सुनावणीच्या अंतिम टप्प्यात जामीन मिळाला आहे.