धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 2 फरार आरोपीच्या अटकपुर्व जामीन अर्जावर धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात युक्तीवाद करण्यात आला. पोलिसांनी केलेला तपास व उपलब्ध पुरावे याचे सखोल विश्लेषण करीत कायदेशीर मुद्यावर वकिलांनी चिरफाड केली. पोलिसांचा तपास व पुराव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले. सुप्रीम कोर्टासह देशातील अन्य उच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखलेही यावेळी कोर्टात सादर करण्यात आले. 7 जणांच्या जामीन अर्जावर 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू तेलंग यांच्या अर्जावरील युक्तिवाद संपला असुन कोर्ट 21 एप्रिल रोजी सोमवारी यावर निर्णय देणार आहे तर इंद्रजीत उर्फ मिटू ठाकुर याच्या अर्जावर 21 एप्रिल सोमवारी उर्वरित युक्तिवाद केला जाणार आहे. धाराशिव कारागृहातील संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे याच्या अटकपुर्व जामीन अर्जावर 24 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला.आरोपीच्या वतीने ऍड अंगद पवार, ऍड विशाल साखरे, ऍड अमोल वरुडकर, ऍड रामेश्वर सुर्यवंशी हे बाजु मांडत आहेत.
तुळजापुर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी असुन 22 आरोपी फरार आहेत तर 14 जन धाराशिव येथील जेलमध्ये आहेत. पोलिसांनी 10 हजार 744 पानाचे चार्जशीट दाखल केले आहे. काही फरार आरोपी चार्जशीट दाखल होण्याची व इतरांच्या अर्जावर काय निर्णय येतो याची वाट पाहत आहेत, सोमवारच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
फरार आरोपी (22) – माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
कारागृहातील आरोपी (14) – अमित उर्फ चिमू अशोक आरगडे,युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, संगीता वैभव गोळे, संतोष अशोक खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहुराज चव्हाण, सुमित सुरेश शिंदे, ऋतूराज सोमनाथ गाडे, संकेत अनिल शिंदे,पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन नागनाथ साळुंके, राहुल सुनील कदम – परमेश्वर व गजानन प्रदीप हंगरगेकर हे 14 जण धाराशिव जेलमध्ये आहेत.