धाराशिव – समय सारथी
जिल्ह्यात २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले.या आपत्तीमध्ये चार जणांचा बळी गेला,पाच जण जखमी झाले,८१ जनावरे दगावली आणि ६०० हून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले.पूराच्या पाण्यात वाहून जाऊन लोहारा,भूम आणि परंडा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला तर उमरगा तालुक्यात एका व्यक्तीचा इतर कारणाने मृत्यू झाला. धाराशिव तालुक्यात एक,तुळजापूर तीन आणि लोहारा एक असे एकूण पाच नागरिक जखमी झाले आहेत.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील ८१ पाळीव जनावरे दगावली असून यामध्ये ४७ मोठी,२७ लहान व ९ ओढकाम करणारी जनावरे आहेत.धाराशिव तालुक्यात २९,परंडा तालुक्यात १६,भूम तालुक्यात ११,उमरगा तालुक्यात ९, तुळजापूर तालुक्यात ७,लोहारा तालुक्यात ५ व कळंब तालुक्यात ४ जनावरे मृत्युमुखी पडली.या नुकसानीमुळे शेतकरी कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे.
घरांची पडझड,शाळांनाही फटका
पूरामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.धाराशिव तालुक्यातील २४५,तुळजापूरातील ९३,उमरग्यातील १००,लोहारा ४१,भूम २८,परंडा १२ व कळंब २२ अशी मिळून ५४१ कच्च्या घरांची पडझड झाली. धाराशिव तालुक्यातील ४५ झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या,तर २५ गोठे बाधित झाले. याशिवाय धाराशिव तालुक्यातील सहा शाळांची पडझड झाली असून शिक्षण व्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. एकूण ६११ मालमत्तांचे नुकसान झाले असून त्यात सहा सार्वजनिक स्वरूपाच्या मालमत्तांचा समावेश आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बाधित कुटुंबांना मदत व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारी यांनी सांगितले आहे.