धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील ग्रामपंचायतमध्ये 25 लाखांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असुन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाला नोटीस काढण्यात आली आहे. चौकशी समितीसमोर अभिलेखे सादर न केल्याने ही रक्कम तात्पुरत्या स्वरूपात खुलाश्याच्या अधीन राहून अपहारीत असल्याचे म्हण्टले आहे. ग्रामसेवक यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले यांच्या पत्रात नमुद केले आहे. या बाबत रामा मस्के यांनी लेखी तक्रार करीत आमरण उपोषण सुद्धा केले होते.
मस्के यांनी दिलेल्या निवेदनानुसार सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व शाखा अभियंता यांनी संगनमत करुन विविध योजनेत 2021 पासुन अपहार केला आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी त्रीसदस्य चौकशी समिती गठीत करण्यात आली होती, त्यावेळी कागदपत्रे दिली नाहीत. समितीच्या अहवालानुसार 2021 पासूनची नोंद वही, खर्चाचे व्हावचर, आराखडे, संचिका ग्रामसेवक यांनी उपलब्ध करुन दिले नाहीत. जिल्हा परिषद शाळेत झालेली साहित्य खरेदी ग्रामपंचायत मार्फत केली असल्याचे दिसुन येते मात्र साठा नोंद वही तपासणीवेळी उपलब्ध करुन दिली नाही. 25 लाख रुपये खर्च केलेल्या कामाचे साठा नोंद वही, संचिका उपलब्ध करुन न दिल्याने ही रक्कम अपहारीत धरत अंतीम संधी दिली आहे.
वेळेत खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा तो असमाधानकारक असल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याचा इशारा कारणे दाखवा नोटीसमध्ये बजावण्यात आला आहे. या खुलासानंतर काय होते याकडे ग्रामस्थ यांचे लक्ष लागले आहे.