दहशत, गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यात चालणार नाही – कठोर कारवाई करू, पोलिस अधीक्षक संजय जाधव
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणी चार अज्ञात आरोपी विरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनाचक्की वादाचा फिर्यादित उल्लेख केलेला नाही. पोलिस सर्व बाजुने तपास करीत असल्याची माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. अशी दहशत, गुंडागर्दी धाराशिव जिल्ह्यात चालणार नाही कठोर कारवाई करू अशी भुमिका घेत जाधव यांनी इशारा दिला आहे.
कदम यांच्या गाडीवर पेट्रोल, अंडे व दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पोलिसांना घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले असुन तपासाला सुरुवात केली आहे, गाडीवर अंडे व पेट्रोलचे फुगे मारून गाडी थांबवत जाळून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमागे कोण याचा शोध सुरु आहे दरम्यान समय सूचकतेमुळे सरपंच या हल्ल्यातून बचावले. या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.
26 डिसेंबर रोजी रात्री तुळजापुरवरुन जवळग्याला परतत होतो. त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजुंनी अचानक दोन बाईक आल्या. बाईकस्वार सतत हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असे आम्हाला वाटले आणि आम्ही गाडी रस्ताच्या मधोमध आणून स्लो केली. आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला. डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले. तेव्हा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो. त्यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली. अंडी फेकल्यामुळे समोरचं काही दिसेनासे झाले. त्यामुळे आमची गाडी पुन्हा स्लो झाली. त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला, असे नामदेव निकम यांनी म्हटले.