धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिस तपासावर वारंवार कोर्टाने नाराजी व्यक्त करीत रिमांड वेळी प्रश्न उपस्थितीत केले, कोर्टाने पोलिसांना 2 वेळेस कोर्टात झापले असतानाच एका आरोपीचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर करताना तपास अधिकाऱ्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. एकंदरीत पोलिस आता कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले असुन त्यांनी दोषारोपपत्रात दिलेल्या पुराव्यांची परीक्षा होत आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात सेवन गटातील आरोपी अलोक काकासाहेब शिंदे यांना अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर करताना कोर्टाने तपास अधिकारी यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अलोक शिंदे यांचे नाव कशामुळे व कशाच्या आधारे समाविष्ट केले याचे स्पष्टीकरण पोलिस देऊ शकले नाहीत. तपास अधिकाऱ्याने कोणत्या कायद्याचा अवलंभ केला आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, पोलिसांना ही मोठी चपराक आहे. ऍड विशाल साखरे यांनी कोर्टात सक्षमपणे बाजु मांडली त्याच्या आधारे जामीन मंजुर केली.जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी जामीन मंजुर करताना अनेक बाबी नोंदविल्या आहेत.
अलोक शिंदे हे तुळजाभवानी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक असुन त्यांचा या गुन्ह्याशी संबंध नाही. त्यांचे 10 हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले होते मात्र ते परत केले, ते व्यवहार ड्रग्जचे नव्हते. या व्यवहारा व्यतिरिक्त कोणतेही व्यवहाराचे पुरावे नाहीत. संकेत व सुमित शिंदे हे अलोक यांचे चुलत भाऊ आहेत. संकेतने अलोक यांची बहीण हिच्या नावाने 10 हजार पाठवले होते, तिला पैशाची गरज होती व त्यानंतर ते पैसे अलोक यांनी 3 महिन्यांनी परत केले.अलोक यांची 15 जुनला नेट परीक्षा आहे. अलोक यांच्या विरोधात पर्याप्त पुरावे नव्हते तरी त्यांना आरोपी केले असा युक्तिवाद ऍड साखरे यांनी केला.
आले पोलिसांच्या मनात… असेच काहीसे झाले आहे. ज्या आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे होते त्यांना ‘अभय’ देणे व ज्याच्या विरोधात पर्याप्त पुरावे नसताना गुन्ह्यात आरोपी करणे असाच प्रकार झाल्याचे कागदपत्रे, कोर्टाचे निरीक्षण व आदेशावरून स्पष्ट होत आहे. दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 जुन रोजी भेटणार आहेत, त्या भेटीत काय होते याकडे लक्ष लागले आहे.
पोलिसांवर टोकाचा राजकीय दबाव असुन ते एका नेतृत्वाचे हातचे ‘बाहुले’ बनले आहे. एकाच दगडात 2 पक्षी (दोन्ही बाजुचे) मारण्यात ‘हातकंडा’ असलेले नेतृत्व निवडणुकीत केलेल्या राजकीय विरोध व उपद्रव मुल्याचा ‘हिशोब’ चुकते करीत असल्याचे बोलले जात आहेत. माझा काय संबंध? मी नाही त्यातला? एकपात्री नाटक,ज्यात कलाकार एक,भुमिका अनेक असे पात्र सुरु आहे. यात एखाद्या पोलिस अधिकारी याचा कारवाईत बळी जाऊ नये, म्हणजे झाले.

विनोद गंगणे या आरोपीच्या जामीन व पोलिस कोठडी रिमांड अश्या 2 वेळेस पोलिसांना कोर्टाने झापले असुन कोर्टाच्या आदेशात अनेक बाबी नोंद करीत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तुम्हाला आरोपी गंगणेला वाचवायचे आहे का तसे असेल तर सांगा? असा प्रश्न विचारला. तुमचे नेमके काय सुरु आहे. दोषारोप पत्र दाखल करताना तस्कर व सेवन असे 2 गट केले ते कोणत्या आधारावर, गंगणे याच्या विरोधात दोषारोप पत्र वेळी पुरावे होते तर मग त्यांना त्याचं वेळी तस्कर गटात का सहभागी केले नाही ? त्यांना त्यावेळी फेव्हर (मदत करायची) द्यायचं व सगळं कोर्टावर सोडून द्यायचं. राजकीय कारण किंवा राजकीय दबाव होता का ? गंगणे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत हे कारण होते का ? असे प्रश्न केले त्यावर तपास अधिकारी गोकुळ ठाकूर निरुत्तरीत झाले.