धाराशिव – समय सारथी
आमदार राणाजगजीतसिंह पाटील हेच भ्रष्टाचाराचे भस्मासुर असल्याचा गंभीर आरोप युवा सेनेचे राज निकम यांनी केला आहे. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रत्येक कामात एक कन्सल्टन्सी का असते याचे उत्तर द्या! दुसऱ्याच्या नावाने स्वतः पैसे कमविण्याची नवी पद्धत यांनीच जिल्ह्यात आणली आहे,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे राज निकम यांनी केली आहे. अभय इंगळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, “कचऱ्याच्या कामात गुत्तेदारी करणाऱ्या अभय इंगळे यांची धाव गल्लीपर्यंतच आहे,” अशी टीका केली.
“सोमनाथ गुरव यांनी सर्व मुद्देसूद माहिती दिल्यानंतर भाजपच्या सर्व हुशार लोकांनी एकत्र येऊन हे प्रसिद्धीपत्रक काढले. चौकात बोलावे अशा पद्धतीने हे पत्रक आहे. यावरून तुमची लोकांसमोर मुद्दे घेऊन जाण्याची क्षमता व मानसिकता दिसत नाही. तुम्हाला फक्त राजकारण करायचे असून तुमच्या लेखी जनतेची किंमत शून्य आहे.”
राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करताना निकम यांनी सांगितले की, “राणाजगजीतसिंह पाटील प्रत्येक मोठ्या कामात कन्सल्टन्सी नेमतात. ती फक्त नावाला असते; त्या कंपनीच्या नावाने पैसे राणा पाटलांच्या खिशात कसे जातात याचे किस्से आम्ही त्यांच्या सोबत असताना ऐकले त्याचे चांगले उदाहरण म्हणजे उजनी पाईपलाईन हे आहे, असा टोला लागवला.